Monday 4 March 2019

सीमेवर लढण्याची परवानगी द्या ! 75 वर्षीय माजी सैनिकाची पत्राद्वारे मागणी


1971च्या भारत पाक युद्धात होते सहभागी

कोल्हापूर: भारत-पाकिस्तानमध्ये काही दिवसांपासून सुरू असलेल्या तनावपूर्ण वातावरणामुळे आम्हाला इथे झोप लागत नाही. जगाच्या नकाशातून पाकिस्तानचे नाव मिटवले पाहिजे. जोपर्यंत त्यांना धडा शिकवणार नाही तोपर्यंत समाधान मिळणार नाही. त्यामुळे मला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, अशा मागणीच्या उल्लेखाने पत्र लिहिले आहे 75 वर्षीय माजी सैनिकांचे ..!

होय हे खरे आहे. या 75 वर्षीय माजी सैनिकांचे नाव आहे गजानन दत्तात्रय पाटील. कागल तालुक्‍यातील यमगे गावचे ते रहिवासी. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात एकच संतापाची लाट उसळली आहे. भारताने या भ्याड हल्ल्याचा बदला घेतला. पण, पाकिस्तानचा नामोनिशाणच जगाच्या नकाशातून मिटवला पाहिजे, अशा संतप्त भावना गजानन पाटील या माजी सैनिकाने लिहिलेल्या पत्रातून उमटल्या आहेत.

पाटील हे एवड्यावरच थांबले नाहीत तर आम्हाला सीमेवर लढण्याची परवानगी द्या, माझ्यासोबत कागल तालुक्‍यातील शेंदुर गावचे माजी सैनिक तुकाराम शेवाळे हे सुद्धा यायला तयार आहेत, अशी सुद्धा मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. जिल्हा सैनिक कल्याण मंडळाकडे त्यांनी हे मागणीचे पत्र पाठवले आहे. विशेष म्हणजे या पत्रच्या शेवटी आम्ही आपल्या ऑर्डरची वाट पाहत बसलो आहोत, असाही उल्लेख केला आहे. या वयातसुद्धा त्यांचा पाकिस्तान विरोधातील त्वेष आणि राष्ट्रा प्रती असलेले प्रेम यातून प्रकट होते.

No comments:

Post a Comment