Saturday 26 August 2023

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे

चित्रपटांच्या दुनियेतला मराठा योद्धा : सुभेदार तान्हाजीराव मालुसरे


 

BABURAO PENTAR TANAJI

सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचा पराक्रम आणि स्वामीनिष्ठा आजवरच्या बखरकारांना, इतिहासाच्या अभ्यासकांना, ललित लेखकांना, चित्रपट व नाट्य निर्माता- दिग्दर्शकांना आणि अभिनय करणाऱ्या कलाकांराना सतत प्रेरणादायी ठरला आहे, देशातील अनेक जण या अद्वितीय पराक्रमी सामर्थ्यवान पुरुषोत्तमाचे चरित्र अभ्यासून भारावले गेले आहेत, आणि ह्या वीरपुरुषाचे वेगवेगळे पैलू लोकांसमोर मांडले आहेत, यापुढेही ते मांडत राहाणार आहेत, कारण शिवचरित्र अखंड 'प्रेरणादायी' तर शिवरायांना जिवाभावाची साथ देणारे प्रसंगी बलिदान देणारे त्यांचे मावळे म्हणजे जगाच्या इतिहासात पहिल्यांदा 'गनिमी कावा' अवलंबणारे पराक्रमाचे आणि धाडसाचे एक एक सोनेरी पान !  छत्रपती शिवाजी राजांच्या चरणी आपली निष्ठा ठेवण्यासाठी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात राहणारा एक रांगडा तरुण शिवरायांच्या पदरी सामील होतो काय अन  त्यांच्याशी इतका समरस होतो काय, की स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून जातोअन वचनाच्या पूर्ततेसाठी मागे न हटता आपला अमोल देह स्वामीनिष्ठेचरणी अर्पण करीत धारातीर्थी पडतो काय.  म्हणून तानाजी मालुसऱ्यांसारखे वीरपुरुष आपली जीवनगाथा लिहून अजरामर झाले ! युगानुयुगे येतील पण तानाजी मालुसरे - सूर्याजी मालुसरे यांचा इतिहास सातत्याने नवीन पिढीला प्रेरणादायी ठरत राहणार आहे. चलतचित्रपटातील पडद्यावरील एखादी कलाकृती श्रेष्ठ ठरते ती दिग्दर्शकामुळे. हल्ली चित्रपटसृष्टीला ऐतिहासिक चित्रपट निर्मितीची भुरळ पडलेली आहे. आजपर्यंत तानाजीरावांच्या पराक्रमी इतिहासाची भुरळ कलामहर्षी बाबुराव पेंटर, चित्रतपस्वी व्ही. शांताराम, ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाळे, ओम राऊत आणि आता दिग्पाल लांजेकर यांना पडल्याने ही ऐत्याहासिक कलाकृती भव्य स्वरूपात मांडण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आजपर्यंत प्रदर्शित झालेल्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पाच चित्रपटांचा हा मागोवा –

DIGPAL TANAJI


दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर व निर्माते प्रद्योत पेंढरकर यांचा "सुभेदार"  (२०२३ )

महाराष्ट्राच्या शिवकालीन इतिहासातील प्रत्येक पान मराठयांच्या अतुलनीय शौर्याने भरलेलं आहे. ‘सुभेदार तान्हाजी मालुसरे’ हे नाव घेतलं की, आपल्याला आठवतो तो ‘कोंढाण्याचा सिंहपराक्रम’. ‘आधी लगीन कोंढाण्याचं आन मग माझ्या रायबाचं’ म्हणत कोंढाण्यावर चढाई करणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे नाव इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिले गेले आहे. नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! सुभेदार तान्हाजी मालुसरे म्हणजे निष्ठा, त्याग, समर्पण याचे मूर्तिमंत उदाहरण ही ओळख पटते. प्रचंड कर्तव्यनिष्ठा दाखवत स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांना स्वराज्याच्या चाकरीपुढं आपल्या संसाराचेही भान नव्हतं. स्वतःच्या मुलाचं लग्न काढलं असताना सिंहगड मोहिमेचा सांगावा आल्यानंतर हा धैर्याचा मेरुपर्वत काळासारखा धावून गेला अन् वचनाच्या पूर्ततेसाठी मागं न हटता आपला देह स्वामी निष्ठेपायी शिवप्रभूंच्या चरणी ठेवला.  लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प असलेला ‘सुभेदार’ चित्रपट २५ ऑगस्ट २०२३ ला चित्रपटगृहांत झळकला आहे. यासंदर्भात लांजेकर यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले, अखेरच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या सुभेदार नरवीर तान्हाजी मालुसरे शिवछत्रपतींच्या योध्यांपैकी महत्वाचे नाव ! तान्हाजीरावांच्या नावाशिवाय शिवचरित्र पूर्ण होऊच शकत नाही. पण तान्हाजीराव म्हणजे केवळ सिंहगडावरची लढाई नव्हे, तर छत्रपतींच्या स्वराज्याची पायाभरणी करणारे आघाडीचे शिलेदार होते, कोंढाणा जिंकण्याची घटना ही सर्वांत मोठी असली तरी त्यामागे असलेलं त्यांचं युद्धकौशल्य, रणनिती, शत्रूला पाहिलं नसतानाही त्याच्या सामर्थ्याबद्दल आणि त्याच्या सैन्याबद्दल केलेला अभ्यास यांसारख्या अनेक बारिकसारिक गोष्टींवर या चित्रपटातून प्रकाश टाकण्यात आला आहे. इतिहास मांडताना तो भव्यदिव्य तर दाखवायचा प्रेक्षकांच्या काळजालाही भिडवायचा होता. त्यादृष्टीने कथा, सादरीकरण, ऐतिहासिक संदर्भ, त्याकाळातील भाषा, शस्त्रास्त्रे, वेशभुषेपासून अगदी अजय पुरकर यांचा अभिनयापर्यंत,  मावळ प्रांतातील भाषा याचा वापर केला. सुभेदार’ चित्रपटाविषयी सांगताना दिग्पाल लांजेकर म्हणाले, “तानाजीराव मालुसरे हे विलक्षण योद्धा होते. शूर योद्धा असण्याबरोबरच तानाजीराव प्रशासकीय कामातही खूप हुशार होते. कोकणात जाणाऱ्या अनेक रस्त्यांचे काम त्यांच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात आले होते. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामात सुद्धा त्यांचा काही अंशी सहभाग होता. प्रशासक म्हणून ते महाराजांच्या आणि आऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली कसे तयार झाले, त्यांनी स्वराज्यासाठी कसे काम केले हे दाखवण्याचा प्रयत्न ‘सुभेदार’मधून करण्यात आला आहे. “‘सुभेदार’ असे चित्रपटाचे नाव ठेवण्यामागे खास कारण आहे ते म्हणजे, ‘सुभेदार’ म्हणून ‘प्रशासकीय’ आणि ‘सैन्य’ अशी दुहेरी जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी सांभाळली होती. अशा दोन्ही प्रकारचे किंवा विभागांचे ‘सुभेदार’ एकच व्यक्ती असणे हे इतिहासातील एकमेव उदाहरण आहे.”  “तुम्ही नेहमी जसा बायोपिक पाहता तसा सुभेदार चित्रपट नसेल. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे भावरुपात्मक टप्पे जसे की, सुभेदारांचे आणि आऊसाहेबांचे नाते, त्यांचे आणि शिवाजी महाराजांचे नाते कसे होते? या गोष्टी पाहायला मिळतील. तानाजी मालुसरे यांचे आऊसाहेब आणि शिवरायांशी घट्ट नाते असल्यामुळे त्यांनी स्वराज्यासाठी बलिदान देताना मागेपुढे पाहिले नाही, ही शक्ती त्यांना कुठून मिळाली? हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटाद्वारे केला आहे.”, असे दिग्पाल लांजेकर यांनी सांगितले. सुभेदार तानाजी मालुसरे हे तर शिवचरित्राच्या महान ग्रंथातील एक झळाळते सुवर्णपान! त्यांचं भावनिक आणि कौटुंबिक आयुष्य दाखवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या शौर्याचं पराक्रमी पान उलगडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.'

OM RAUT TANAJI


ए.ए.फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची प्रस्तुती असलेल्या ‘सुभेदार’ चित्रपटाची निर्मिती राजवारसा प्रोडक्शन, मुळाक्षर प्रोडक्शन, पृथ्वीराज प्रोडक्शन, राजाऊ प्रोडक्शन, परंपरा प्रोडक्शन यांनी केली आहे.प्रद्योत पेंढारकर,अनिल वरखडे, दिग्पाल लांजेकर, चिन्मय मांडलेकर, श्रमिक गोजमगुंडे, विनोद जावळकर, शिवभक्त अनिकेत जावळकर, श्रुती दौंड हे ‘सुभेदार’ चित्रपटाचे निर्माते आहेत. चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, मृणाल कुलकर्णी आऊसाहेब, स्वतः दिग्पाल बहिर्जी नाईक असे कलाकार आहेत. सर्वात वरचढ म्हणजे अजय पूरकर तान्हाजी मालुसरे शोभले आहेत. केवळ नजरेने एखाद्याला गारद करण्याची ताकद तान्हाजींमध्ये होती. अजय पूरकर यांची शरीरयष्टी आणि अभिनय दोन्ही गोष्टी तान्हाजी मालुसरे आपल्यासमोर जिवंत उभे करतात. शूटिंगच्या दरम्यान अजय पुरकर यांच्या पायाला जखम झाली होती. ऍक्शन सीन करताना त्यांच्या अंगठा आणि बोटाच्या मध्ये त्यांचा पाय २ इंच जखम होईल असा फाटला होता. त्याही परिस्थितीत शूटिंग पूर्ण केले होते. तान्हाजीरावांच्या भूमिकेत शिरण्यापूर्वी मी उमरठ येथील सुभेदारांच्या समाधीजवळ डोळे मिटून बसलो होतो. त्यावेळी मी त्यांना तुमचं पूर्ण चरित्र मांडतोय हे सांगितलं. त्या ठिकाणी नतमस्तक झालो आणि त्यांना विचारलं की तुम्हीच सांगा काय, कसं करायचं आहे. त्यामुळे मी सुभेदारांनाच विचारुन ही भूमिका साकारली आहे”, असेही पुरकर यांनी भूमिका साकारण्यामागची प्रेरणा सांगितली.

ram gabale TANAJI


कलामहर्षी बाबुराव पेंटर यांचा ' सिंहगड '(१९२२) –

चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंनी आपल्या देशात चित्रपट युगाला  सुरुवात केली तेव्हा ते मुकपट होते परंतु त्यांचा चेहरा प्रामुख्याने पौराणिक होता, तर कलामहर्षी बाबूराव पेंटरानी आपल्या सिंहगड चित्रपटाद्वारे १९२२ ला ऐतिहासिक चेहरा दिला. बाबूराव पेंटर यांना शिवचरित्रावरील चित्रपटांचे जनक म्हणावे लागेल,  शिवरायांवर नाटके खूप झाली पण चित्रपट करणारे पहिले बाबूराव पेंटरच. बाबूराव पेंटर यांनी १९२२ साली 'सिंहगड' हा पहिला शिवचरित्रपर चित्रपट बनवला. चित्रपट मूक असल्यामुळे कथाविषय सर्वाना माहिती असेल असाच हवा म्हणून कादंबरीकार ह. ना. आपटे यांची १९०३ साली लिहिलेली  'गड आला पण सिंह गेला' ही  सुप्रसिद्ध  ऐत्याहासिक कादंबरी निवडली. बाबुरावांच्या या चित्रपटाने लोकांच्या मनावर राज्य केले. हा चित्रपट अत्यंत लोकप्रिय ठरल्याने या चित्रपटाला तुफान गर्दी होऊ लागली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांची संख्या वाढवण्यात आली. चित्रपटाच्या उत्पन्नाचे आकडे प्रसिद्ध होत असल्यामुळे यावर सरकारचेही लक्ष गेले आणि या चित्रपटाला पहिल्यांदा 'करमणूक कर' बसवला व या चित्रपटापासून हिंदुस्थानात तो कायम झाला. पुढे काही वर्षांनी लंडन येथे जागतिक प्रदर्शनात 'सिंहगड' हा चित्रपट दाखवला गेला, त्यावेळी परीक्षकांनी दिलेल्या प्रशस्तीपत्रावर पुढील वाक्य आहे- "This picture is an out standing example of sincerity of direction.

TANAJI SAMADHI PUTALA


ह्या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका बाबूराव पेंटर यांनी स्वतः केली. त्यांच्या बरोबर तानाजी मालुसरे ( बाळासाहेब यादव ), उदयभानू ( झुंजारराव पवार),  शेलार मामा यांची भूमिका २३ वर्षीय व्ही. शांताराम अशा प्रमुख भूमिका होत्या. या सर्व भुमिका इतिहासाच्या पानातून बाहेर आल्यासारख्या वाटत. कल्ले, दाढ्या, पगडया, कमरची घोंगडी,मुंडासे, हातातल्या काठ्या, पहरेकऱ्यांच्या खाटा, पायातल्या जाड तळाच्या वहाणा, कानातले मोठे मोठे वाळे, हातातली कडी वैगरे सर्व अगदी हुबेहुब असे. हा चित्रपट सिंहगडावर चित्रित करण्याचा बाबुराव पेंटरांचा मानस होता पण पैशाअभावी तो फोल ठरला आणि पन्हाळगडावर चित्रीकरण करण्यात आले. बाह्यचित्रीकरणाचा हिन्दुस्थानातला हा पहिलाच प्रयत्न. ऐत्याहासिक लढाया परिणामकारक दिसाव्यात यासाठी कोल्हापुरातील एक वस्ताद बाळासाहेब आणि झुंजारराव यानां शास्त्रोक्त शिक्षणासाठी दररोज येत असे. दांडपट्टा, घोडदौड, तलवार बाजींचा सराव चालू असताना एके दिवशी अचानक आग आग असा ओरडा ऐकू आला. बाबुरावांच्या स्टुडिओला आग लागली होती आणि ती चहूबाजूला पसरत जाऊन स्टुडिओ खाक झाला. यापूर्वी प्रदर्शित केलेले सैरंध्री,  वत्सलाहरण, दामाजी या चित्रपटाच्या लोकमान्य टिळक आणि नटवर्य गणपतराव जोशी यांच्यावरील लघुपटाच्या निगेटिव्ह भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र एका तगड्या तरुणाने धाडसाने त्या आगीत प्रवेश करीत मोठ्या कष्ठाने बाबुरावांनी स्वतः बनविलेला देशी कॅमेरा वाचविला. आगीची बातमी ऐकून छत्रपती शाहू महाराजही आपल्या खडखड्याचे घोडे दौडवत आले. तर कोल्हापूरचे श्रीमंत सरदार नेसरीकर यानी या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी भांडवल पुरवण्याचे कबूल केले. हे दु:ख विसरुन बाबुरावानी पन्हाळा किल्ल्यांवर बाह्यचित्रण सुरु केले. पन्हाळ्याच्या तीन दरवाज्यापाशी पाऊणशे मंडळींचा मुक्काम होता, चित्रपटात काम करणाऱ्या स्त्रिया पहाटे उठून नास्ता-जेवण करीत तर चित्रपटातले नायक-खलनायक पाणी भरण्याचे तसेच प्रसंगी जेवण वाढप्याचे सुध्दा काम करीत. शुटींग दरम्यानच्या काळात एकदा घोड्याला टाच मारताना घोडे बेफाम झाले आणी बाबुराव घोड्यावरुन खाली पडले. तानाजी कोंढाण्याचा डोणगिरी कडा चढतो आहे अश्या प्रसंगासाठी आजूबाजूच्या गावात सनदी पाठवून पिळदार दोनशे मावळ्यांना हजर राहण्यास सांगितले. त्यानंतर मोहिमेवर निघतानाच्या दृश्यात एक वृध्द बाई तानाजीला आशिर्वाद देते हा प्रसंग हुबेहुब येण्यासाठी कुशिरे गावातील एका स्त्रीची निवड केली होती. हातघाईच्या लढाईत तानाजी,सूर्याजी एकत्र दिसावेत यासाठी विशिष्ट् तंत्र वापरुन दिवाळीला लावण्यात येणाऱ्या चंद्राज्योतीच्या दारुचा उपयोग केला तसेच प्रथमच मस्किंगची पध्दत अमलात आणली. सिंहगड मधील शेवटचं लढाईचं दृश्य रात्रीच्या वेळी चित्रित करायचं होतं, तानाजी व शेलारमामा घोरपडीच्या आधाराने सिंहगडावर निवडक मावळ्यांसह चढून जातात व किल्ल्याचा दरवाजा उघडून मराठा सैन्याला आत घेताना रात्रीच्या गडद अंधारात लढाईची एकच धुमचक्री चालू होते, मशालीच्या उजेडात ही दृश्ये चित्रीत होऊ शकत नव्हती. शेवटी बाबुराव पेंटरानी एक युक्ती शोधून काढली, दिवाळीला चंद्रज्योत हा दारुकामाचा एक प्रकार पेटवण्यात येतो, या चंद्राज्योतीचा खुप लख्ख पांढरा प्रकाश पडतो, या चंद्राज्योतीतील दारु दृश्यांच्या आवश्यकतेप्रमाणे एका लांब रांगेत रांगोळी प्रमाणे ठेवून ती मशालीने पेटवून त्या उजेडात लढाईची दृश्ये चित्रीत केली जात. चंद्राज्योतीचा बराचसा धुर वाऱ्याने वाहून जात असे आणी थोडाफार धूर दृश्यावर आला तरी तो मशालीचा धूर आहे असे वाटत असे. रात्रीच्या दृश्यांचे चित्रण विजेच्या दिव्याशिवाय आपल्या देशात पहिल्यांदा हे असं पार पडलं. पेन्टरानी तयार केलेले भव्य ऐतिहासिक देखावे,पडद्यांवर आलेली रोमांचकारी दृश्ये, उत्कट देशप्रेमाने ओथंबलेले वीररसाचे प्रसंग, बाळासाहेब यादवांची नरवीर तानाजीची व झुंजारराव पवारांची उदयभानुची उत्कृष्ट दणदणीत भुमिका यामुळे पुर्वीच्या सर्व मुकपटापेक्षा सिंहगड जास्त लोकप्रिय व लाभदायक झाला. चित्रपट पुर्ण झाल्यानंतर तो पाहण्यासाठी श्रीमंत नेसरीकर, श्रीमंत बापुसाहेब इंगळे, श्रीमंत कागलकर अशी राजघराण्यातील मान्यवर मंडळी उपस्थीत होती. तेव्हाच्या मुंबईतील नॉव्हेल्टी नाट्यगृहात बाबुरावानी स्वत: रेखाटलेली छत्रपती शिवाजी महाराज,नरवीर तानाजी, उदयभानू, मावळे यांची भव्य पोस्टर्स लावली. गेटवर काही लाकडी ऐत्याहासिक प्रसंग उभे केले. त्यामूळे ती पाहाण्यास लोकांची एकच गर्दी उसळली. मुंबईला नॉव्हेल्टी सिनेमागृहात हा चित्रपट सलग सोळा आठवडे चालला होता, तो पडद्यावर आला तेव्हा पावसाचे दिवस होते, आणि पावसात या चित्रपटाने सोळा आठवड्याचा रन मिळवला होता हे या चित्रपटाच सर्वात मोठं यश होतं, आपल्या देशात चित्रपटांची सुरुवात झाल्यावर इतका लॉंग रन मिळवणारा हा पहिलाच चित्रपट, संपूर्ण मुंबईचे वातावरण शिवकालींन झाले होते. नुकतीच हिंदू-मुस्लिम दंगल शमली होती त्या पार्श्वभुमिवर प्रख्यात म्यॅजेस्टिक टॉकिजने हा चित्रपट नाकारला होता. प्रचंड गर्दी पाहुन पहिल्या खेळाला पोलीसांना पाचारण केले होते, अखेर चित्रपट सुरु झाला, टायटल्स सुरु होत पडद्यांवर तानाजी आणि शिवाजी महाराजांचे दर्शन झाले, प्रेक्षकानी टाळ्या वाजवून हर हर महादेवसह दोघांच्या नावाच्या उस्फूर्त आरोळ्या सुरु झाल्या. उदयभानूच्या वाराने जेव्हा तानाजी कोसळतो तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आले.

V SHANTARAM SINHGAD


प्रभातच्या चित्रपती व्ही शांताराम यांचा  ' सिंहगड '(१९३३) –

स्वातंत्र्याचा मंत्र देणारा ऐत्याहासिक 'सिंहगड' हा बोलपट काढण्याचे प्रभात फिल्म कंपनीने ठरवले. १९२२ च्या बाबुराव पेंटरांच्या चित्रपटात व्ही. शांताराम यांनी शेलारमामांची भूमिका केली होती. पण यावेळी त्यांनी स्वतःला पूर्णपणे पडद्याआड ठेवले. शंकराराव भोसले यांनी या चित्रपटात  तानाजी मालुसरे यांची भूमिका तर कमलकुमारी (लीला चंद्रगिरी), देवलदेवीची (प्रभावती), छत्रपती शिवाजी महाराज (गणपत शिंदे) उदयभानू ( बाबुराव पेंढारकर ), बुवासाहेब (घेरेसरनाईक) मा. विनायक (जगतसिंह) केशवराव धायबर (शेलारमामा) यांनी भूमिका अविस्मरणीय केल्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन करताना शांताराम यांनी नेहमीच्या रुळलेल्या चाकोरीतून न जाता काहीतरी वेगळ्या पद्धतीने अनेक दृश्य चित्रित केली, रात्रीच्या  लढाईचा  प्रसंग चित्रित करताना त्यांनी अंधारात दोन्ही पक्षांचे तुंबळ युद्ध चालू असताना तोफा डागायचे ठरवले, तोफातून एका पाठोपाठ एक याप्रकारे गोळे बाहेर पडत असताना दारूचा जो प्रकाश पडेल, त्या प्रकाशात युद्धाचा प्रकाश व काळोख असा फार गमतीचा खेळ पडद्यावर दिसत होता. ही दृश्ये या चित्रपटाची प्रमुख आकर्षण ठरली. पोवाडा हा संगीतप्रकार या चित्रपटातून प्रथमच पडद्यावर आला. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध स्वातंत्र्याचा लढा जोरात सुरु होता. त्याचवेळी या चित्रपटातून लहरी हैदर यांनी रचलेला पोवाडा 'चल उठ गड्या, चल वीर गड्या, घेऊन भाला, ढाल गड्या, शूर शिपाई शिवाजीचा तू, मर्द मराठा मावळचा ' या वीरश्रीयुक्त पोवाड्याने जनक्षोभ अधिक उसळत असे. गोविंदराव टेबे यांनी अत्यंत जोशपूर्ण संवाद लिहून अभिनय व संगीताप्रमाणे चित्रपटासाठी लेखणीचं  कसब सिद्ध केलं. जुन्या जमान्यातील हा चित्रपट, त्यावेळी विजेच्या दिव्यावर किंवा बंदिस्त साउंड प्रूफ स्टुडिओत चित्रीकरण होत नसे. चित्रपट म्हणावा तेव्हढा गतिमान झाला नव्हता तरीही त्याकाळी 'सिंहगड' प्रचंड गाजला आणि त्यातुन प्रभातच्या चालकांना पुढचे रंगीत चित्रपट निर्माण करण्याची उमेद मिळाली.

ज्येष्ठ दिग्दर्शक राम गबाले यांचा ' नरवीर तानाजी ' ( १९५२ ) –

मुंबईच्या कोहिनूर टॉकीजचे मालक श्री कान्हेरे यांनी एक ऐत्याहासिक चित्रपट करायचे ठरवले. साहजिकच शिवरायांचा पराक्रमी शिलेदार नरवीर तानाजी मालुसरे हा विषय त्यांनी निवडून बाबुराव पैलवान (तानाजी मालुसरे), मा. विठ्ठल (छत्रपती शिवाजी महाराज ), दुर्गाबाई खोटे (जिजामाता), रायबा (मदनमोहन ) शेलारमामा (केशवराव धायबर ) यांच्याबरोबर नायिका सुलोचना, वसंतराव पैलवान असा कलाकारांचा संच निवडला. बाबुरावांचे व्यक्तिमत्व रांगडे होते. त्यांची पैलवानी देहयष्टी तानाजीच्या भूमिकेला शोभून दिसणारी होती. पण मराठी संवाद बोलण्याची त्यांची बोंब होती. या चित्रपटातील त्यांचे सारे संवाद प्रख्यात गीतकार ग दि माडगूळकर यांच्या आवाजात डब केले गेले. दिग्दर्शक म्हणून राम गबाले यांनी ऐत्याहासिक चित्रपट केला नव्हता. यात लढाया,  कुस्त्या, वाघाशी झुंज,  दांडपट्ट्याने हत्तीची सोंड छाटणे असे प्रसंग चित्रित करायचे होते. भगवानदादा यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रीकरणाला सुरुवात झाली. हत्तीची सोंड कापण्याच्या प्रसंगासाठी हत्ती पाहिजे होता, ग दि माडगूळकर यांच्या ओळखीने औंध संस्थानाचा हत्ती मिळाला. हत्ती व्ही.आय.पी असल्याने त्याचं खाणं -पिणं, राहाणे आणि माहुताची बडदास्त ठेवली गेली होती. स्टुडिओमध्येच उदयभानूच्या वाड्याचा मोठा सेट उभारला होता. रात्रीचा सीन होता. लढाई चालू असताना तानाजी दांडपट्टा चालवीत सपासप शत्रूसैन्य कापत हटवत येतो. लढाई अगदी निकारावर आल्यावर उदयभानु हत्तीवर स्वार होऊन तानाजीच्या दिशेने अंगावर येत असताना तानाजी हत्तीची सोंड हातात धरून कापतो, खरे तर तो प्रसंग अवघड होता. त्या काळात आतासारख्या स्पेशल इफेक्टच्या सोयीचा अभाव होता, ट्रकच्या टायरची ट्यूब कापून सोंडेसारखी हत्तीच्या सोंडेला दुमडून बांधली होती. सर्व तयारी झाली. माहूत त्याच्या भाषेत हत्तीला चुचकारत होता. हत्तीनं पळत येणं आणि तानाजीने सुरक्षित अंतरापर्यंत दांडपट्टा फिरवीत जाणे एव्हढाच शॉट हवा होता, सर्व तयारी झाली, तानाजी ठरलेल्या अंतरापर्यंत आला आणि हत्तीने एकदम रागावून ' हे काय बांधलय' या भावनेने पक्की बांधलेली इनर ट्यूब रागाने उडवून टाकली आणि नासधूस करू लागला. दुसरा प्रसंग तानाजी जंगलात वाघाशी सामना करतो असा सीन होता. त्यासाठी शिकाऊ वाघ कुठे मिळेल तिथे जायचं ठरलं. पंढरपूरच्या सर्कशीत असा वाघ आहे असे समजल्यानंतर चित्रपटाचा चमू तिकडे गेला. एका बंदिस्त धर्मशाळेत झाडांच्या फांद्या, मोठमोठे दगड लावून जंगलाचा देखावा उभा करून सेट उभारला. वाघाच्या रिंगमास्टरला तानाजी सारखे केस, भरदार मिश्या, कपडे, डोक्यावर मराठेशाही पगडी, वैगरे वेशभूषा करून तयार ठेवला. वाघाचे स्वतंत्र आणि एकत्र शॉट्स घ्यायची योजना पक्की केली. कॅमेराच्या लेन्सपुरती मोकळी जागा ठेऊन डुप्लिकेट तानाजी आत सोडला. वाघाने रिंगमास्टरला आवाजावरून ओळखले परंतु आपला हा रोजचा भिडू आज हे काय करून आलाय म्हणून वाघाने डरकाळी फोडत त्याची पगडी आणि केसांचा विग उडवून दिला. मात्र पुढे बाबुराव पेहेलवानांच्या सोबत हवे तसे शॉट्स चित्रित झाले. चित्रीकरण संपल्यानंतर सर्कशीच्या चमूला एक ग्रुप फोटो काढायचा होता, वाघ मध्ये आणि त्याच्या बाजूला तो रिंगमास्टर उभा राहिला. नेहमी फोटोमध्ये मध्यभागी महत्वाच्या जागी उभे राहणारे मान्यवर यावेळी मात्र फोटोत दूर दूर उभे राहिले. हा चित्रपट सुद्धा भरपूर चालला.


अजय देवगण-ओम राऊत यांचा ‘तान्हाजी: द अनसंग  वॉरियर’ (२०२०)  -

'हर मराठा पागल है शिवाजी महाराज का और भगवे का' अशा दमदार डायलॉगसह 'तानाजी : द अनसंग वॉरियर' हा हिंदी बहुचरर्चित  चित्रपट संपूर्ण देशभर प्रदर्शित करण्यात आला. लढवय्या तानाजींची ही वीरगाथा आधुनिक तंत्रज्ञान वापरुन बनवली होती. अंगावर शहारे आणणारी दृश्ये  चित्रपटात  साकारण्यात आली, तान्हाजींचे जीवन आणि त्यांनी मुघलांवर मिळवलेला विजय 3 डी प्रसंगांतून ७० एमएम पडद्यावर जिवंत करण्याचा प्रयत्न केला होता. अभिनेत्री काजोलने तानाजीच्या पत्नीची सावित्रीबाई यांची भूमिका साकारताना कपाळी ठसठशीत कुंकू, नाकात नथ, डोक्यावर पदर आणि करारी नजर अशा तिच्या मराठमोळ्या लुकचं तुफान कौतुक झाले होते. तसेच अभिनेता शरद केळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तर कोंढाण्याचा अधिकारी असणाऱ्या उदयभानू राठोडची भूमिका सैफ अली खान याने केली.  १५० कोटी रुपयांचा  बजेट असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊतने केले होते. सिनेमाविषयी बोलताना अजय देवगन म्हणाले होते की, भारताच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावणाऱ्या तान्हाजीसारख्या शूरवीराची कहाणी सादर करताना मला अतिशय आनंद वाटतो आहे. मला ही कथा आपल्या देशाच्या नव्हे तर जगाच्या प्रत्येक काना-कोपऱ्यापर्यंत पोहोचलेली पहायची आहे.” आणि तसेच घडले. संपूर्ण भारतातील सर्व प्रांतातील  सर्वभाषिकांनी या चित्रपटाचे उस्फुर्त स्वागत केले. त्यामुळे या चित्रपटाने ३०० करोडहून अधिक कमाई केली होती.

रवींद्र मालुसरे

अध्यक्ष, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

९३२३११७७०४

 

Wednesday 23 August 2023

वृत्तपत्र लेखक हा 'समाजमनाचा आरसा

लोकप्रतिनिधी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी पत्रलेखन महत्त्वाचे - ना. मंगलप्रभात लोढा

वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृतमहोत्सवी वर्षाला प्रारंभ

 

वृत्तपत्र लेखक हा 'समाजमनाचा आरसा1


 

मुंबई : (रवींद्र मालुसरे) -  सोशल मीडियावरील सामाजिक पत्रकारितेच्या वाढत्या प्रसारामुळे, ‘वर्तमानपत्रांतील वाचकांची पत्रे’ हा स्तंभ यापुढे दुबळा होत जाईल अशी भीती वाटत असली तरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी तसेच सत्ताधारी आणि प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी संपादकीय पानावरील त्यांची हक्काची जागा अबाधित राहणे गरजेचे आहे. बोधकथेतील लहानशी चिमणी आपल्या चोचीत पाणी आणून

जंगलातील आग विझवण्याचा प्रयत्न करतेयाची इतिहासाने नोंद घेतली आहे असेच तुम्ही करीत आहात. त्यामुळे तुम्ही आणि प्रिंट मीडियाने दर्पणपासून सुरू झालेली ही परंपरा टिकवण्यासाठी जबाबदारी घेणे गरजेचे आहे असे मत राज्याचे मंत्री ना मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले. दादर येथील काणे उपाहारगृहाच्या सभागृहात वृत्तपत्र लेखक चळवळीच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या शुभारंभ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे होते. या वेळी व्यासपीठावर संघाध्यक्ष रवींद्र मालुसरेउद्योजक सुरेशराव कदमकामगार नेते दिवाकर दळवीसामाजिक कार्यकर्ते प्रदीप मणिशंकर कवठेशिक्षणतज्ज्ञ आनंद मापुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

वृत्तपत्र लेखक हा 'समाजमनाचा आरसा


काळाची गरज म्हणून  समाजासाठी आवश्यक असलेली वृत्तपत्र लेखकांची ही चळवळ खंडित होणार नाही याची जाणीव ठेवून संस्थेच्या कार्यालयीन जागेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन देत ते पुढे असेही म्हणाले कीएका अर्थानेवृत्तपत्रलेखक हा समाजमनाचा ‘आरसा’ असतो. 

आसपासच्या परिस्थितीकडे डोळे- आणि कानदेखील- उघडे ठेवून पाहण्याची सवय आणि सहसा सामान्यांच्या नजरेस किंवा मनास न जाणवणाऱ्या बाबींची तत्परतेने नोंद घेण्याची सवय या बाबी उपजतच अंगी असाव्या लागतात.  वृत्तपत्रलेखकामध्ये मात्र या बाबी जाणवताततो हातात लेखणी घेतो आणि निर्भीडपणे आपले मत लिहून वर्तमानपत्राकडे पाठवून देतोभले ते छापून येवो की नाही पण हे काम तो निस्वार्थीपणे करतो. म्हणूनच वृत्तपत्रलेखक हा व्यावसायिक पत्रकार नसला तरी पत्रकाराप्रमाणेच त्याचे डोळे-कान उघडे असतातआसपासच्यासर्वांनाच दिसणाऱ्या घटनांमधील ‘बातमी’मूल्य असलेले वेगळेपण टिपण्याची क्षमता व त्याचे विश्लेषण करून त्यातील वेगळेपण नेमके निवडून लोकांसमोर मांडण्याचे कौशल्य त्याच्याकडे असते. एका अर्थाने ही पत्रकारिता क्षेत्राची ‘तिसरी बाजू’ आहे.

 

उद्योजक सुरेशराव कदम यांनी आपल्या भाषणात संघाच्या कार्याचे कौतुक करताना अमृत महोत्सवी वर्षात कार्यक्रम करण्यासाठी एक लाख रुपये देणगी दिली. 

ज्येष्ठ वृत्तपत्र लेखक मधुकर कुबल आणि मनोहर मांदाडकर यांनी संस्थेच्या आणि वृत्तपत्र लेखन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना जीवन गौरव पुरस्कार ना. मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याचप्रमाणे आचार्य अत्रे यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त कॉ मणिशंकर कवठे स्मृतिनिमित्त आयोजित केलेल्या 'अत्रेय प्रहारया लेख स्पर्धेचा पारितोषिक वितरण तसेच वर्तमानपत्रातून सातत्याने लिहिणाऱ्या वृत्तपत्र लेखकांचा गौरव करण्यात आला.  

२२ ऑगस्ट १९४९ फोर्टच्या तांबे उपहारगृहातील चळवळीचे पहिले संमेलन ते २२ ऑगस्ट २०२३ मामा काणे उपाहारगृहातील हे 'अमृत महोत्सवी संमेलनयाचा आणि संस्थेच्या कार्यक्रम उपक्रमांचा आढावा संघाध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी आपल्या प्रास्ताविकात घेतला. 

संघाचे प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन राजन देसाई यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्याध्यक्ष रमेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाडराजन देसाईअब्बास अत्तारदिगंबर चव्हाणविजय ना कदमनंदकुमार रोपळेकरपास्कोल लोबोसुरेश पोटेसुनिल कुवरेदत्ताराम गवस यांनी विशेष मेहनत घेतली.


Sunday 20 August 2023

डॉ गजानन शेपाळ यांच्या 'रंगासभा' ग्रंथाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात सुरु करण्यासाठी केंद्र व राज्याकडे पाठपुरावा करण्याचे राज्यपालांचे आश्वासन

सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगातील संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा: राज्यपाल रमेश बैस

सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योगातील संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा: राज्यपाल रमेश बैस


नवी दिल्ली येथील ललित कला अकादमीचे विभागीय केंद्र महाराष्ट्रात लवकरात लवकर सुरु व्हावे यासाठी आपण व्यक्तिशः लक्ष घालू तसेच केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करु, असे आश्वासन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे दिले.  

 

सर .जी. उपयोजित कला महाविद्यालय येथील प्राध्यापक डॉ. गजानन शेपाळ यांच्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या दृश्यकला विषयक लेखांचे संकलन असलेल्या 'रंगसभा' या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल बैस यांच्या हस्ते शनिवारी (दि. १९) महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडले, त्यावेळी ते बोलत होते

यावेळी प्रकाशन सोहळ्याला ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष डॉउत्तम पाचरणे, मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे अध्यक्ष रविंद्र मालुसरे, ज्येष्ठ पत्रकार विवेक सबनीस, उपयोजित कला महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ संतोष क्षीरसागर कला क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.  

 

सर्जनशील आणि सांस्कृतिक उद्योग क्षेत्र जगातील अर्थव्यवस्थेत सर्वाधिक गतीने वाढणारे क्षेत्र आहे. कलात्मक वस्तूंचा जागतिक व्यापार सातत्याने वाढत आहे या क्षेत्रात रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होत आहेत. या संधींचा कलाकारांनी लाभ घ्यावा असे राज्यपालांनी सांगितले. कला, शिल्पकला, वारसा, संगीत या क्षेत्रात खासगी क्षेत्राने देखील गुंतवणूक करावी असे राज्यपालांनी सांगितले.   न्यूयॉर्क येथील 'मेट गाला' फॅशन उत्सवाप्रमाणे मुंबईचा देखील कलाविषयक 'मेट कला' महोत्सव असावा अशी अपेक्षा राज्यपालांनी यावेळी व्यक्त केली

 

राज्यातील कला महाविद्यालयांमध्ये हजारो विद्यार्थी कला शिक्षण घेत आहेत. या महाविद्यालयांचे बळकटीकरण करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण केले पाहिजे. या दृष्टीने कला संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत आपण शासनाला सूचना करू असेही राज्यपालांनी सांगितले

 

आदिवासी समाज तसेच ग्रामीण भागात लोक घरी चित्र लावतात किंवा रांगोळी काढतात. त्याचप्रमाणे शहरातील लोकांना देखील आपल्या घरी, भिंतींवर कलाकृती असावी असे वाटते. मात्र कलाकृती जनसामान्यांना परवडणाऱ्या असल्या पाहिजे. तसे झाल्यास कलेचे लोकशाहीकरण होईल असे सांगताना आपल्या कलाकृती परवडणाऱ्या नसल्या तर चीन सारखे देश आपल्या स्वस्त कलाकृती मूर्ती घरोघरी पाठवतील असा इशारा राज्यपालांनी दिला

 

आपण स्वतः एक छोटे दृश्य कलाकार असून जे जे स्कुलला भेट देण्याचे आपले स्वप्न होते, असे राज्यपालांनी सांगितले. गजानन शेपाळ यांनी राज्यातील अनेक ज्ञात अज्ञात दृश्य कलाकारांना तसेच कला संस्थांना आपल्या लिखाणाच्या माध्यमातून प्रकाशात आणल्याबद्दल राज्यपालांनी त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे आयोजक असलेल्या मराठी वृत्तपत्रलेखक संघ मुंबईने अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल राज्यपालांनी संस्थेचे अभिनंदन केले.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख कार्यवाह प्रशांत घाडीगांवकर, कार्याध्यक्ष रमेश सांगळे, कोषाध्यक्ष आत्माराम गायकवाड, नितीन कदम, राजन देसाई, दिगंबर चव्हाण, विजय ना कदम, मनोहर साळवी, सतिश भोसले, सुनील कुवरे, दत्ताराम गवस, अब्बास अतार, प्रकाश बाडकर, दिलिप सावंत, नंदकुमार रोपळेकर, पास्कोल लोबो, जे जी स्कुलमधील प्रा राहुल मेश्राम, दीपक वर्मा, सौ निता चौधरी, सौ राधिका कुसुरकर-वाघ  आदींनी विशेष मेहनत घेतली.