Showing posts with label Strike. Show all posts
Showing posts with label Strike. Show all posts

Thursday, 13 October 2016

हे पहिलेच सर्जिकल हल्ले - पर्रीकर

मुंबई - पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमध्ये परिसरात वेगळे धोरण अवलंबत भारताने केलेले हल्ले हे पहिलेच लक्ष्याधारित हल्ले (सर्जिकल स्ट्राइक्‍स) असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज स्पष्ट केले. या कारवाईने मिळालेले यश हे कोट्यवधी भारतीयांचे आणि विशेषत: भारतीय सैन्यदलाचे असल्याचे सांगत, त्यांनी नेहमी अमलात आणल्या जाणाऱ्या धोरणात काहीसे बदल करून धडा शिकवण्याचा निर्णय घेतला गेला, त्याचे श्रेय मात्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे असल्याची टिप्पणी केली.

मुंबईत "फिन्स‘ या संस्थेने आयोजित केलेल्या "संवाद संरक्षणमंत्र्यांशी‘ या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रोत्यांनी विचारलेल्या निवडक प्रश्‍नांना त्यांनी या कार्यक्रमात प्रदीर्घ उत्तरे दिली. संरक्षणतज्ज्ञ नितीन गोखले यांनी पर्रीकर यांना विविध विषयांवर बोलते केले.

"सर्जिकल स्ट्राइक्‍स‘ यापूर्वीही करण्यात आले होते, याकडे या संवादादरम्यान लक्ष वेधताच कोणतीही राजकीय टिप्पणी न करता पर्रीकर यांनी, ""अशी नीती पहिल्यांदाच प्रत्यक्षात आणली गेली. यापूर्वी जे व्हायचे ते त्या त्या भागातील लष्करी अधिकाऱ्याने तेथील तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता दिलेले उत्तर असायचे. त्याला लष्करी भाषेत "कोव्हर्ट ऑपरेशन‘ म्हणतात,‘‘ असे नमूद केले. निर्णय घेण्याची राजकीय इच्छाशक्‍ती महत्त्वाची असते असे नमूद करत या कारवाईचे कोणतेही श्रेय भाजपला नको आहे. तसा प्रयत्न करायचा असता तर हल्ल्याची घोषणा संरक्षणमंत्र्यांनी केली नसती काय, असा प्रश्‍न त्यांनी केला. दहशतवादी कारवाई झाली, की भारत सरकार यापूर्वी केवळ निषेधाचे फतवे काढत असे, समज देत असे. या धोरणात बदल का झाला, या गोखले यांच्या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी, "प्रत्येक वेगळी नीती अमलात आणावी लागते. उत्तर देण्याची पद्धत समोरच्याला बुचकळ्यात टाकणारी असावी लागते,‘ अशा मोजक्‍या शब्दांत उत्तर देत याहून अधिक काही बोलणे उचित नसल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षांत अनेक प्रलंबित संरक्षणखरेदी करार मार्गी लागले, लढाऊ "राफेल‘ विमानांच्या खरेदीचा 2000 मध्ये मंजूर झालेला करार 16 वर्षांनी का होईना प्रत्यक्षात आला, अशी माहिती देत त्यांनी संरक्षण खरेदीसाठी उपलब्ध होणारा निधी चारपटीने वाढल्याकडेही लक्ष वेधले. "काहीतरी चूक होईल या भीतीने कोणताही निर्णय न घेण्यापेक्षा काहीतरी करणे महत्त्वाचे आहे,‘ असे सांगत त्यांनी पूर्वीच्या सरकारचे नाव न घेता टोलाही मारला. सुरक्षा आणि त्यासाठी करावी लागणारी उपाययोजना ही प्रत्येक नागरिकाच्या मनात असावी लागते, याकडे लक्ष वेधत त्यांनी यापुढे सीमेपलीकडून काही कुरापती घडल्यास वेगळेच उत्तर दिले जाईल. संरक्षणविषयात धक्‍कातंत्र हे महत्त्वाचे असते याकडे लक्ष वेधले. उरी आणि पठाणकोट तळांवर हल्ले होण्याची पूर्वसूचना मिळाली होती; पण त्याचा योग्य वापर न झाल्याने अनावस्था ओढवली काय, यावर उत्तर देताना पर्रीकर यांनी, "कोणत्याही गुप्तचर संस्थेला शंभर टक्‍के योग्य माहिती देता येत नाही, शिवाय कधीतरी गफलत होणे हा मानवी स्वभाव असतो,‘ अशी सावध माहिती दिली.

जवानांसाठी बुलेटप्रूफ खरेदीचे अधिकार स्थानिक दलप्रमुखांना दिले आहेत, तसेच "वन रॅंक वन पेन्शन‘चा विषयही आता यशस्वीरीत्या सुटला आहे, असे ते म्हणाले. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी आता अणुयुद्धाची भाषा का सोडली, या प्रश्‍नावर त्यांनी पाकिस्तानचे नाव न घेता, "भारताने दिलेले उत्तर कुणालाही अपेक्षित नव्हते; शिवाय आता संरक्षण, युद्ध यात पारंपरिकतेला फाटा बसला आहे हे लक्षात घ्यायला हवे,‘ असे स्पष्ट केले.
चीनशी संबंध सुधारले
पाकिस्तानला चीनकडून होणारी संभाव्य मदत लक्षात घेता केंद्र सरकार चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय का घेत नाही, या प्रश्‍नाला उत्तर देताना पर्रीकर यांनी नवे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षांत चीनशी संबंध लक्षणीयरीत्या सुधारले आहेत याकडे लक्ष वेधले आणि जागतिक व्यापार संघटनेशी झालेल्या करारानुसार कोणत्याही देशाच्या मालावर बहिष्कार टाकता येणे शक्‍य नाही; मात्र नागरिक कोणत्या वस्तू घ्यायचा याचा स्वयंनिर्णय घेऊ शकतातच ना, अशी मिस्कील टिप्पणी केली.
स्वदेशीसाठी तंत्रविकासाची गरज
देशी बनावटीच्या युद्ध साहित्यात काही शस्त्रे आपल्या लष्कराकडे आहेत. मात्र याबाबत तंत्र विकसित नाही. परिणामी, आपला देश 100 टक्के युद्धसाहित्य निर्माण करू शकत नाही, अशी स्पष्ट कबुली पर्रीकर यांनी दिली. युद्ध साहित्य बनवण्यास अधिक किमतीचे सुटे भाग तयार करावे लागत असल्याने, आपण परदेशातील साहित्य खरेदी करतो. रडारसारखी यंत्रणाही आपण निर्माण करू शकत नाही. मात्र भविष्यात याबाबत विचार करता येईल, असेही ते म्हणाले. नवी मुंबईतील वाशी येथे संरक्षण क्षेत्रातील विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते.

पर्रीकर म्हणाले, ""सध्या संरक्षण दलात अनेक प्रयोग अमलात आणले जात आहेत. मात्र याचे परिणाम लगेचच दिसणार नसले, तरी आगामी काळात ते नक्कीच दिसून येतील. सध्या हेलिकॉप्टरचे सुटे भाग निर्माण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. मात्र हे उत्पादन बाहेर येण्यास आणखी काही कालावधी लागेल. पूर्वी युद्धसामग्रीची 500 ते 600 कोटींची निर्यात व्हायची. आता हीच निर्यात तीन हजार कोटींवर आली असून, लवकरच आठ ते दहा कोटींपर्यंत नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे.‘‘

पूर्वी परवाना नसताना निर्यात धोरण सुरू होते. मात्र या परवाना पद्धतीच्या अनेक जाचक अटी शिथिल केल्यामुळे "मेक इन इंडिया‘ योजनेअंतर्गत आता दहा हजार कोटींच्या निर्यातीचे ध्येय दोन वर्षांत गाठणे शक्‍य होईल, असा विश्‍वासही पर्रीकर यांनी व्यक्त केला. युद्धसामग्री तयार करण्यासाठी तीन लाख कोटींची ऑर्डर आहे. दोन वर्षांत दोन लाख 20 हजार कोटींची शस्त्रे खरेदीच्या मागणीवर निर्णय घेण्यात आला आहे. यात 75 टक्के सामग्री देशी बनावटीची असेल, असे ते म्हणाले.

- पीटीआय

Friday, 30 September 2016

पाकिस्तानविरुद्ध शिवरायांची नीती प्रभावी - कर्नल सुरेश पाटील


पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय लष्कराने केलेल्या कारवाईबद्दल लष्कराचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. अत्यंत कौतुकास्पद आहे. उरी हल्ल्यानंतर तडकाफडकी प्रतिक्रिया न देता भारताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या नीतीचा केलेला अवलंब प्रभावी आहे. या कारवाईबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करायला हवे.

या परिस्थितीत थेट युद्धासाठी आव्हान देणे योग्य ठरणार नाही. मात्र, या कारवाईमुळे देशवासीयांमधील संतापाला वाट मिळेल. आंतरराष्ट्रीय संबंधांबाबत राजनैतिक धोरण परिणामकारक ठरत असताना ताबडतोब आव्हान न देता, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी ही युद्धनीती उपयुक्त ठरेल. त्यामुळे या हल्ल्याबद्दल भारताला दोष देऊ शकणार नाहीत. अन्यथा घाईत दिलेली प्रतिक्रिया म्हणजे अपरिपक्व कारवाई वाटली असती. मागील काही वर्षांमधील प्रगतीमुळे भारताचे स्थान उंचावलेले आहे. त्याला साजेशी अशी कारवाई करण्यासाठी मोदींनी शिवाजी महारांजांची नीती वापरली आहे.

अशा हल्ल्यात कमीत कमी वेळात शत्रूचे जास्त नुकसान केले जाते. शस्त्रांचे आगार (कोट) व दारूगोळा साठविण्याची ठिकाणे उडविली जातात.

थेट युद्धाने देश 50 वर्षे मागे जाईल!

सर्जिकल स्ट्राइक अतिशय योग्य असून, त्यामुळे आपली हानी कमी होते. या उलट थेट युद्ध केल्यास ते पाच दिवस जरी झाले तर भयंकर खर्च होतो. तसे युद्ध केल्यास अर्थव्यवस्थेवर ताण येऊन पेट्रोल होईल 200 रुपये लिटर, आणि दूध होईल 100 रुपये प्रतिलिटर. युद्धामध्ये अमाप दारूगोळा वापरावा लागतो. एका तोफगोळ्यासाठी दोन हजार ते लाखो रुपयांपर्यंत खर्च होतो. 100 मीटर ते काही किलोमीटर अंतरापर्यंतचा पल्ला गाठणारे हे गोळे असतात. काही वेळातच कोट्यवधी रुपयांचे नुकसान होईल, आणि युद्ध करणारा देश 50 वर्षांनी मागे जाईल.

दोन्ही देशांमध्ये 80 टक्के जनता ही कमी उत्पन्न असणारी आहे. युद्ध आणि शस्त्रास्त्र स्पर्धांमुळे अधिकाधिक खर्च होत राहतो. देशाच्या अर्थव्यवस्थेवरील ताण वाढतो. क्युबा देशामध्ये 20 टक्के खर्च शिक्षणावर केला जातो. आपल्याकडे हे प्रमाण दीड टक्का एवढे कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्ध करताना रयतेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी नेहमी घेतली. रयतेच्या कल्याणाला प्राधान्य देण्याची त्यांचे धोरण होते.

आत्मघातकी हल्ल्यांपेक्षाही प्रभावी...

दोन पाकिस्तानी दहशतवादी येऊन हल्ला करतात, आणि आपला देश हालवून टाकतात. आपणही तसे हल्ले पाकच्या हद्दीत घडवून आणू शकतो, परंतु आपल्याला लौकिकाला ते साजेसे ठरणार नाही. हानी टाळण्यासाठी ही सर्जिकल पद्धत योग्य ठरते.

शत्रूची ठाणी आणि दारुगोळा उद्ध्वस्त करणे हे परिणामकारकता वाढविण्यासाठी आवश्यक आहे. अशा हल्ल्यांमध्ये नुकसान करून परत येऊ शकतो. हल्ला केलेल्या ठिकाणाजवळ छोटी गावे असतात, तिथे राहून हल्ला घडविण्याचे एक तंत्र आहे, मात्र भारतीय सैन्याची तिथे ताबडतोब ओळख पटू शकते, त्यामुळे ते तंत्र धोकादायक आहे. पाकपुरस्कृत दहशतवादी मात्र काश्मीरमधील फुटीरवाद्यांच्या मदतीने असे हल्ले घडवून आणतात.

दहशतवाद्यांनी वापरले अत्याधुनिक तंत्र...

उरी येथे झालेल्या हल्ल्यावेळी दहशतवाद्यांनी अत्याधुनिक फॉस्फरस ग्रेनेडचा वापर केला. हा हल्ला अतिशय नियोजनपूर्वक केल्याचे स्पष्ट होते. हे ग्रेनेड टाकल्यावर त्याचे तुकडे उडतात, त्यातून फॉस्फरस गॅस बाहेर उडतो. त्याचा धूर होतो, शरीरावर किंवा कापडावर ते उडताच आगीचा भडका होतो. उरी हल्ल्यात  जवान आगीमध्ये होरपळून हुतात्मा झाले, त्यावरून तिथे असेच फॉस्फरस ग्रेनेड वापरल्याचे दिसते.

भारतीय सैन्याचेही नुकसान शक्य...

या हल्ल्यात आपल्या बाजूला किती हानी झाली आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारतीय सैन्याचेही काही नुकसान झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण, सीमेलगतच्या भागात भूमिगत सुरुंग (लँडमाइन) पेरलेले असतात, त्यामुळे त्या ठिकाणी जाताना व्यक्तीसोबत, जीपसारखी वाहने आणि रणगाडेसुद्धा उद्धवस्त करण्याची क्षमता असते. तसेच, पाककडून गोळीबारामुळेही हानी झालेली असेल.

खरंच युद्ध करायचं का?

युद्ध करा हे बोलणे खूप सोपे आहे. परंतु, सीमेवर लढताना आम्ही स्वतः मृत्यू जवळून पाहिला आहे. ज्याचा मुलगा युद्धात गेला आहे त्या आईला विचारा युद्ध हवंय का? जिचा नवरा युद्धात हुतात्मा झालाय त्या पत्नीला विचारा युद्ध हवे आहे का? हुतात्मा कर्नल महाडिक यांच्या घरी मी गेलो होतो, तेव्हा पत्नी गाईसारखा हंबरडा फोडत होती. ते पाहवत नव्हते.

- कर्नल सुरेश पाटील

'आसुर' मर्दन!

‘एलओसी’ओलांडून सर्जिकल स्ट्राइक; उरी हल्ल्याचा घेतला बदला

नवी दिल्ली - जम्मू-काश्‍मीरमधील उरीच्या लष्करी तळावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ११ दिवस संयम बाळगलेल्या भारताने नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानला जबरदस्त प्रत्युत्तर दिले. लष्कराच्या विशेष जवानांनी काल मध्यरात्रीपासून आज पहाटेपर्यंत केलेल्या पाच तासांच्या लक्ष्यवेधी कारवाईत (सर्जिकल स्ट्राइक) नियंत्रण रेषेपलीकडील दहशतवाद्यांचे सात तळ उद्‌ध्वस्त केले. या कारवाईत किमान ३५ ते ४० दहशतवादी आणि पाकिस्तानचे नऊ सैनिक ठार झाले.

पाकिस्ताव्याप्त काश्‍मीरमध्ये जमलेल्या दहशतवाद्यांना आणि त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानी नेतृत्वाला हा इशारा मानला जातो. काल (ता. २८) मध्यरात्री सुरू झालेली ही कारवाई आज पहाटे साडेचारच्या सुमारास समाप्त झाली. नियंत्रणरेषा ओलांडून भारताने प्रथमच अशी कारवाई केली आहे. या कारवाईत हवाई दलाचेही सहकार्य होते. उरीतील लष्कराच्या ब्रिगेड मुख्यालयावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात १८ जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची मागणी जोरात होती. ‘उरीच्या हल्लेखोरांना शिक्षा दिली जाईल आणि १८ जवानांचे हौतात्म्य आम्ही विसरणार नाही,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले होते, तसेच हल्ल्याचे ठिकाण आणि वेळ लष्कर ठरवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार लष्कराच्या विशेष जवानांनी ही कारवाई यशस्वी केली. उरीतील हल्ल्यानंतर व्याप्त काश्‍मीर व नियंत्रणरेषेपासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरील भागात एक आठवड्यापासून लक्ष केंद्रित करण्यात आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली, तर कुपवाडा आणि पूंचजवळच्या नियंत्रणरेषेजवळील पाच-सहा ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनी सांगितले.

अर्थात लष्कराने कारवाईचा तपशील देण्याचे टाळले असले, तरी यात दहशतवाद्यांची आणि त्यांच्या पाठीराख्यांची लक्षणीय प्रमाणात हानी झाल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे ही मोहीम सुरू ठेवण्याची कोणतीही योजना नाही, असेही लष्करातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

लष्कराने काल मध्यरात्री नियंत्रण रेषेपलीकडे पाकिस्तानच्या हद्दीतील दहशतवाद्यांचे तळ उद्‌ध्वस्त करण्यासाठी केलेली कारवाई यशस्वी झाल्यानंतर याची माहिती तातडीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल हे यावर लक्ष ठेवून होते, असे कळते. यानंतर पंतप्रधान मोदींनी आज सकाळी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन या कारवाईची माहिती दिली. तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही सरकारतर्फे याबाबत माहिती देण्यात आल्याचे समजते. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारास लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालयातर्फे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत या कारवाईची औपचारिकरीत्या घोषणा करण्यात आली. लष्करी कारवाई विभागाचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग आणि परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ही पत्रकार परिषद घेतली. पाकिस्तानी हद्दीमध्ये असलेल्या तळांवर मोठ्या प्रमाणात दहशतवादी जमा झाले असून, त्यांची घुसखोरी रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी निवेदनात स्पष्ट केले. अर्थात ही पत्रकार परिषद निवेदनापुरतीच मर्यादित राहिली.

लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग यांनी प्रारंभी उरी आणि पूंछमधील हल्ल्यांची पार्श्‍वभूमी विशद केली. नियंत्रण रेषेजवळील तळांवर मोठ्या संख्येने जमा झालेल्या दहशतवाद्यांचा घुसखोरी करण्याचा आणि जम्मू-काश्‍मीर व देशातील महानगरांमध्ये हल्ले घडवून आणण्याचा त्यांचा डाव आहे, अशी विश्‍वसनीय आणि अचूक माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या तळांवर लक्ष्याधारीत हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) केले. या संभाव्य घुसखोरीमुळे भारतीय नागरिकांची जीवितहानी होऊ नये या उद्देशानेच लष्कराने ही कारवाई केली, असे त्यांनी सांगितले.

या कारवाईमध्ये दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या पाठीराख्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर ही कारवाई थांबविण्यात आली आहे. पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही. परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईची माहिती पाकिस्तानी ‘डीजीएमओ’ यांना देण्यात आल्याचे सांगताना लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग म्हणाले, की शांतता आणि सौहार्द राखण्यासाठी भारत कटिबद्ध आहे. मात्र दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेपलीकडे राहून कारवाया कराव्यात आणि आपल्या नागरिकांवर हल्ले करत राहावे हे खपवून घेतले जाणार नाही. दहशतवाद्यांना भारताविरुद्ध कारवायांसाठी आपल्या भूप्रदेशाचा वापर करू दिला जाणार नाही, या २००४ मध्ये पाकिस्तानने दिलेल्या ग्वाहीची त्यांनी पाकिस्तानला आठवण करून दिली.

उरी येथे लष्कराच्या मुख्यालयावर १८ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये १८ जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. तसेच, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सरकारवर वाढत्या दबावानंतर काल मध्यरात्री लष्कराने दहशतवाद्यांना धडा शिकवला. गेल्या वर्षी भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत शिरून नागा दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई केली होती. त्यानंतर कालच्या कृतीने भारतीय लष्कराची सक्षमता पुन्हा एकदा जगासमोर आली आहे. यामध्ये लष्कराच्या तुकड्या आणि हेलिकॉप्टरचा वापर झाल्याचे समजते.

पुन्हा अशी कारवाई करण्याची लष्कराची कोणतीही योजना नाही; परंतु, कोणत्याही प्रकारचा आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास त्याला तोंड देण्यासाठी भारतीय लष्कर सदैव सज्ज आहे.

- लेफ्टनंट जनरल रणबीरसिंग, महासंचालक, लष्करी कारवाई

सर्जिकल स्ट्राइक म्हणजे काय?

नियोजनबद्ध आणि नेमकेपणाने केलेल्या लष्करी कारवाईला ‘सर्जिकल स्ट्राइक’ म्हटले जाते. या कारवाईमध्ये जे लक्ष्य असते, त्यावरच थेट हल्ला केला जातो. आजूबाजूच्या कोणालाही या हल्ल्यामुळे नुकसान पोचणार नाही, याची काळजी यामध्ये घेतली जाते. ‘सर्जिकल स्ट्राइक’मध्ये कायद्याअंतर्गत बसणाऱ्या गोष्टींचा विचार करूनच शत्रूच्या तळावर हल्ला केला जातो. यामध्ये कोणतीही वाहने, इमारती अथवा सार्वजनिक पायाभूत सुविधांची किंवा उपयुक्त गोष्टींची हानी होणार नाही याचीही खबरदारी घेतली जाते. ठरलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेऊन विमानातून बाँबहल्ला करणे हे ‘सर्जिकल स्ट्राइक’चे योग्य उदाहरण म्हणता येईल. जमिनीवरून बाँबहल्ला करण्याच्या हे अगदी विरुद्ध आहे.

अशी झाली कारवाई...

विशेष कृती दलाने बुधवारी (ता. २८) रात्री १२.३० ते पहाटे ४.३० या दरम्यान पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये दोन किलोमीटर आतपर्यंत असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर ही कारवाई केली.

जवानांना उतरविण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत

व्याप्त काश्‍मीरमधील भिंबर, हॉटस्प्रिंग, केल आणि लिपा सेक्‍टरमध्ये ही कारवाई झाली.

किमान १५० जवानांना या ठिकाणी हेलिकॉप्टरद्वारे उतरविण्यात आले.

पर्रीकर, दोवाल यांचे कारवाईवर लक्ष

अत्यंत नियोजनबद्ध चाल करत जवानांनी सात दहशतवादी तळ नष्ट केले.

भारताची हानी नाही; मात्र किमान ३८ दहशतवादी ठार.

कारवाईनंतर...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक.

राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेऊन मोदींनी दिली लष्करी कारवाईची माहिती.

उपराष्ट्रपती डॉ. हमीद अन्सारी यांनाही दिली माहिती.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही याविषयी सांगितले.

गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सोनिया गांधींसह सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना या कारवाईबाबत माहिती दिली.

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी लष्करी कारवाईबाबत कळविले.

राजनाथसिंह यांनी घेतली सर्वपक्षीय बैठक.

पाककडून हल्ल्याची शक्‍यता लक्षात घेऊन पंजाब, राजस्थानमधील सीमेला लागून असलेल्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर.

जम्मू आणि काश्‍मीरमध्येही याच पद्धतीची दक्षता.

हल्ला झाल्याचा पाकिस्तानकडून इन्कार; नऊ सैनिक ठार झाल्याचा दावा

संकेत धुडकावून भारताने आक्रमण केल्याचा नवाझ शरीफ यांचा कांगावा

पुढच्या वेळी आम्ही उत्तर देऊ - ख्वाजा असिफ यांची धमकी

- - सकाळ न्यूज नेटवर्क