Showing posts with label सकाळ. Show all posts
Showing posts with label सकाळ. Show all posts

Monday, 26 September 2016

लष्कर बोलत नाही, थेट पराक्रम करते!

नवी दिल्ली - उरीतील पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यानंतर मौनात गेलेल्या केंद्र सरकारचे प्रमुख, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे केरळातील सभेपाठोपाठ "आकाशवाणी” वरील “मन की बात” मधून उरी हल्ल्याचा उच्चार करत हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांना माफ करणार नाही, असे सांगितले. “लष्कर बोलत नाही, थेट पराक्रम करते”, असा अत्यंत सूचक इशारा मोदी यांनी शत्रूराष्ट्राला दिला.


“मन की बात” ला आज दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त “आकाशवाणी” ला पंतप्रधानांनी धन्यवाद दिले. मोदी यांनी काल कोझीकोडच्या जाहीर सभेत उरीतील 18 हुतात्मा जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असा विश्‍वास देशवासीयांना दिला होता. सत्तेवर येण्यापूर्वीचे मोदी यांची भाषा उरीतील हल्ल्यानंतर एकदम बदलून मवाळ झाल्याने शोकसंतप्त देशवासीयांमध्ये सखेद आश्‍चर्य व्यक्त होत आहे. जनतेचा आक्रोश “पीएमओ” पर्यंत पोचल्यानेच मोदींना उरी हल्ल्याचा सलग दोनदा जाहीर उच्चार करणे भाग पडल्याचे मानले जाते.


मोदींनी आजच्या कार्यक्रमाची सुरवातच उरी हल्ल्यातील 18 हुतात्म्यांना आदरांजली वाहून केली. या हल्ल्याबाबत पंतप्रधानांनी एकदा किमान तोंड तरी उघडावे, अशा प्रकारच्या सूचनांचा पाऊस "नरेंद्र मोदी व माय जीओव्ही ऍप‘वर पडला होता. त्या अनुषंगाने मोदी म्हणाले,  “आपली सेना शूर आहे व भारतात घुसखोरी करण्याचा प्रत्येक प्रयत्न ती हाणून पाडेल. राजकारण्यांना बोलण्याच्या अनेक संधी मिळतात; पण लष्कर बोलत नाही, तर फक्त पराक्रम करते.”

 
काश्‍मीरमधील अशांततेबाबत बोलताना सत्यपरिस्थिती काश्‍मिरी लोकांसमोर आल्याने त्या लोकांनाही शांतता हवी आहे, असा दावा केला. उरीतील हल्ल्यानंतर हर्षवर्धन या 11वीच्या विद्यार्थ्याने पाठवलेल्या पत्राचा उल्लेख मोदींनी केला. महात्मा गांधी स्वच्छता मोहिमेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त मोदींनी या मोहिमेची सुरवात चांगली झाल्याचे प्रशस्तीपत्र स्वतःच्या सरकारला दिले. दिल्लीतील रेस कोर्स रोडचे बारसे लोककल्याण मार्ग असे नुकतेच करण्यात आले. या नामबदलाचे ठाम समर्थन करताना पंतप्रधानांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव या नामबदलाशी जोडले.
अपंग खेळाडूंचे कौतुक

रियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत अपंग खेळाडूंनी केलेल्या भरीव कामगिरीची मोदींनी भरभरून स्तुती केली. अपंगत्वालाही पराभूत करणाऱ्या नगरच्या दीपा मलिक, एका तपानंतर दुसऱ्यांदा ऑलिंपिक सुवर्णपदक पटकावून वयावर मात करणारे देवेंद्र जांझरिया, 21 वर्षांचा एम. थंगवेलू या सुवर्णपदक विजेत्यांचे त्यांनी मुक्तपणे कौतुक केले.

-सकाळ न्यूज नेटवर्क

Saturday, 24 September 2016

काश्‍मिरातील स्थितीबाबत राजनाथ-पर्रीकर यांची चर्चा

नवी दिल्ली - उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान सीमेवर असलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर गृहमंत्री राजनाथसिंह आणि संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आज काश्‍मीरमधील परिस्थितीबाबत चर्चा केली. तसेच अंतर्गत सुरक्षेचा आणि पुढील महिन्यात गोव्यामध्ये होणाऱ्या "सार्क‘ परिषदेच्या सुरक्षेचाही या दोघांनी आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

गृहमंत्रालयात दुपारी बाराच्या सुमारास दोन्ही मंत्र्यांची बैठक झाली. उरीमधील दहशतवादी हल्ल्यात 18 जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याने देशभरात संतापाची लाट उसळली असून, पाकिस्तानविरुद्ध ठोस कारवाईसाठी सरकारवर दबावही येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राजनाथसिंह आणि पर्रीकर यांनी अर्धा तास चाललेल्या या बैठकीदरम्यान काश्‍मीरमधील परिस्थिती, तसेच नियंत्रण रेषेवरील स्थितीचा आढावा घेतला आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केली. पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर डोळ्यांत तेल घालून लक्ष देण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. सीमेवर होणारी घुसखोरी रोखण्यासाठीच्या उपाययोजना, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात नौदल तळाच्या परिसरात संशयितांचा वावर असल्याची माहिती याबाबतही दोन्ही मंत्र्यांनी चर्चा केली. "ब्रिक्‍स‘ परिषदेच्या सुरक्षेचाही मुद्दा या चर्चेत होता असे सांगण्यात आले. गोव्यात (पणजी) 15 व 16 ऑक्‍टोबरला ही परिषद होणार आहे. यात भारताव्यतिरिक्त ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेचे उच्चस्तरीय प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सध्याच्या तणावग्रस्त वातावरणात या परिषदेची सुरक्षा महत्त्वाची असल्याने त्याबाबतही गृहमंत्री व संरक्षण मंत्र्यांनी आढावा घेतल्याचे सांगण्यात आले.

- - सकाळ न्यूज नेटवर्क