Sunday 3 March 2019

शहिदांचे स्मारक उभारा


म टा प्रतिनिधी, नाशिक सैन्यामध्ये जाणारा प्रत्येक तरुण देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावण्याची तयारी ठेवतो मात्र, वीरमरण प्रत्येकाच्या नशिबी नसते...

30 | Updated:Mar 2, 2019, 04:00AM IST

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सैन्यामध्ये जाणारा प्रत्येक तरुण देशरक्षणासाठी जिवाची बाजी लावण्याची तयारी ठेवतो. मात्र, वीरमरण प्रत्येकाच्या नशिबी नसते. असे मरण एखाद्यालाच येते, असे सांगत भारतीय माजी सैनिक संघटनेने शहीद जवान निनाद मांडवगणे यांना शुक्रवारी श्रद्धांजली अर्पण केली. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांच्या स्मृती जपण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शहीद स्मारक उभारायला हवे, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली.

शहीद निनाद यांना अखेरचा निरोप देण्यासाठी डीजीपीनगर येथील बँक ऑफ इंडिया कॉलनीत नाशिककरांनी मोठी गर्दी केली. आपल्या शहरातील एक जवान देशाच्या कामी आला, या भावनेने प्रत्येक जण या वीरपुत्राच्या कर्तृत्वाला वंदन करण्यासाठी येथे पोहोचत होता. त्यामुळे या परिसरात नजर जाईल तेथे निनाद यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्यांची गर्दी होती. प्रत्येक जण भावूक झाला. भारतीय माजी सैनिक संघटना, वीरपत्नी/माता संघटनेचे पदाधिकारी, माजी सैनिक, त्यांचे कुटुंबीयदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. सैन्यदलात भरती होणारा प्रत्येक जण देशासाठी प्राणांची आहुती देण्याची तयारी ठेवतो. मात्र, असे वीरमरण प्रत्येकाच्या नशिबी नसते. या शहीद जवानांच्या स्मृतींचे जतन व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधान्याने शहीद स्मारकाच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

'राफेल आणा राफेल'

देशाच्या संरक्षणासारख्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी वर्षानुवर्षे आपण जुनीच विमाने आणि हेलिकॉप्टर वापरतो हे दुर्दैव असल्याची भावना या वेळी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष विजय पवार यांनी व्यक्त केली. आपली विमाने म्हातारी झाली आहेत, तरीही ती जवानांना चालवावी लागतात, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. पंधरा वर्षांपासून आम्ही राफेलबद्दल ऐकतो आहोत. ते केव्हा येणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राफेलबाबत वादावादी करण्याऐवजी ते लवकरात लवकर आणून सैन्यदलाला अधिक सशक्त करावे, अशी मागणी पवार यांनी केली.



No comments:

Post a Comment