Sunday 17 February 2019

जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाहीः अण्णा हजारे

'पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशातील जनता याचा नक्कीच बदला घेईल', असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'अशीच अवस्था १९६५पूर्वीही झाली होती. त्यावेळी त्याचा बदला घेताना भारतीय सैनिक थेट लाहोरपर्यंत गेले होते. त्यावेळी पाकिस्तानने शरणागती पत्करली होती', असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स | Updated:Feb 16, 2019, 04:00AM IST


नगर : 'पुलवामा दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशातील जनता याचा नक्कीच बदला घेईल', असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शुक्रवारी व्यक्त केला. 'अशीच अवस्था १९६५पूर्वीही झाली होती. त्यावेळी त्याचा बदला घेताना भारतीय सैनिक थेट लाहोरपर्यंत गेले होते. त्यावेळी पाकिस्तानने शरणागती पत्करली होती', असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
उपोषणानंतर थकवा व अशक्तपणाने हजारेंना नगरमधील खासगी रुग्णालयात विश्रांतीसाठी दाखल करण्यात आले आहे. ते माजी सैनिक आहेत. १९६५च्या युद्धातही त्यांनी भाग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील हुतात्मा जवानांना त्यांनी येथे श्रद्धांजली अर्पण केली. अण्णा म्हणाले, 'जवानांचे बलिदान देश विसरणार नाही. एकाचवेळी एवढ्या जवानांवर बेसावधपणे हल्ला करून त्यांचे प्राण घेतल्याच्या घटनेने देश दुःखाने व्याकुळ झाला आहे. कुठपर्यंत हे सहन करायचे, एकदा होऊन जाऊ द्या आरपार, त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, अशी भावना देशातील अबालवृद्धांमध्ये आहे व सरकारने आता तिचा विचार केलाच पाहिजे', असे अण्णा म्हणाले. 'शत्रूशी लढताना जी माणसे देह ठेवतात, त्यांना मोक्ष मिळतो व ती मला येऊन मिळतात, असे श्रीमद भगवतगीतेत श्रीकृष्णाने म्हटले आहे. त्यामुळे हुतात्मा जवानांना मोक्ष मिळालेलाच आहे. वयोमानानुसार मला आज हत्यार पेलवणार नाही. पण जर माझी गरज पडलीच तर सीमेच्या रक्षणासाठी लढणाऱ्या जवानांना सामग्री पुरवण्याचे काम मी आजही करीन', अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

https://maharashtratimes.indiatimes.com/ahmednagar-news/the-sacrifice-of-the-soldiers-will-not-be-wasted/articleshow/68014656.cms

No comments:

Post a Comment