Wednesday 18 July 2018

लष्कराचे काश्‍मीरात लोकाभिमुखच धोरण

लष्कर प्रमुखांचा दावा
नवी दिल्ली - जम्मू काश्‍मीरात राज्यपाल राजवट लागू करण्यात आल्यानंतर लष्कराच्या तेथील भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही, आमची तेथील भूमिका नेहमीप्रमाणे लोकाभिमुख स्वरूपाचीच आहे असे लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. आमचे तेथील धोरण हे दहशतवाद्यांचा नायनाट करायचा हे आहे. तेथील सामान्य नागरीकांना त्रास होऊ नये याची आम्ही काळजी घेऊ असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्यपाल राजवटीनंतर लष्कराने तेथे आक्रमकपणा स्वीकारला आहे या म्हणण्यात तथ्य नाही असेही त्यांनी आज येथे, पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की राज्यपाल राजवटीनंतर काश्‍मीरातील लष्कराचे धोरण कठोर झाले आहे असे सर्व साधारण चित्र रंगवले जात आहे पण त्यात तथ्य नाही.

लष्करप्रमुखांनी आज येथे बारामुल्ला येथील विद्यार्थ्यांशीही चर्चा केली. त्यात पाच विद्यार्थींनींचाही समावेश होता. काश्‍मीरातील दगडफेक आणि दहशतवादी कारवाया थांबल्या तर आपल्याही परिसराचा दिल्ली किंवा देशातील अन्य मोठ्या शहरांप्रमाणे विकास होऊ शकतो हा संदेश हे विद्यार्थी आता येथून काश्‍मीरात नेतील असा विश्‍वासही जनरल रावत यांनी यावेळी व्यक्त केला

No comments:

Post a Comment