Monday 15 January 2018

अणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे-बिपिन रावत

नवी दिल्ली : भारत आणि पाक दरम्यान सध्या वाकयुद्ध सुरु आहे. त्यातच लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. युद्ध झालेच तर पाकिस्तानात घुसून मारु, अशा शब्दात रावत यांनी पाकला सुनावले आहे.
भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केले आहे, की युद्ध झाले आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणे पाकिस्तानने बंद करावे. बिपिन रावत यांनी ही भूमिका घेतल्यानंतर पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिले आहे.
"भारतीय सेना प्रमुखांकडून आलेले विधान जबाबदारीने केलेले नाही. जर भारत आमच्याकडून अणूबॉम्ब युद्धाची भाषा करत असेल तर आम्हालाही आमची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत यांच्या मनातली शंका दूर होईल", असे ख्वाजा असिफ यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. "भारताच्या सेना प्रमुखांनी दिलेली धमकी ही भारताच्या नव्या विचारांना स्पष्ट करते.
कोणत्याही गैरसमजात राहू नका. कारण, पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांनीशी पूर्णपणे सज्ज आहे", असे पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. दरम्यान, आता यासर्व प्रकारात भारताकडून कोणती प्रतिक्रिया येते हे पाहणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment