Monday 15 January 2018

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 2) - कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

अलीकडेच पाकिस्तानी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींनी भारता विरुद्ध शॉर्ट रेंज न्युक्‍लियर वेपन्सच्या उपयोगाची धमकी दिली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा राष्ट्रपती किम जोंग उननेही "उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम पूर्ण झाला असल्याचे सांगत नव्याने धमकी दिली आहे. चीन व रशियाच्या मेहेरबानीमुळे उत्तर कोरियाला संयुक्त राष्ट्रसंघाने घातलेल्या आर्थिक प्रतिबंधांची पर्वा नाही. त्याचप्रमाणे चीनच्या आर्थिक व सामरिक मदतीच्या जोरावर पाकिस्तानही अमेरिकन मदतीला ठोकर मारू शकत आहे. यामुळे ही दोन्हीही राष्ट्रे आण्विक शस्त्रांच्या बाबतीत "चिकन गेम' आणि "गेम थियरी' अंगिकारू शकतात.

अणुबॉम्बचा वापर झालेले युद्ध अनंत काळपर्यंत संपत नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस हिरोशिमा व नागासाकीवर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बनी अनुक्रमे 1,40,000 व 81,000 लोक मारले गेले. मात्र, त्यानंतर आण्विक अस्त्रांची मारक शक्ती प्रचंड वाढल्यामुळे अमेरिकन राष्ट्रपती जॉन केनेडींनी ""आपण सर्व अतिशय तरल व नाजुक धाग्याला बांधलेल्या आण्विक तलवारीच्या धारेवर बसलो आहोत, जो केव्हाही अविचार अथवा वेडाच्या भरात तोडला जाऊ शकतो' अशी ताकीद 1962 मध्ये दिली होती. पण त्याला कोणी महत्त्व दिले नाही. कारण मानसशास्त्रानुसार, शोककाळात किंवा स्वअस्तित्व संपूर्णत: धोक्‍यात आल्यानंतर त्या संबंधातील कुठल्याही धोक्‍याला नाकारणे ही स्वाभाविक मानसिकता आहे. त्याला अनुसरून किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष व राजनेते आण्विक युद्धाच्या धमक्‍या देताना राजकीय व सामरिक सुज्ञता, आण्विक युद्धातील स्फोट, अग्नीवर्षाव, प्रभावी उत्सर्जित किरण वर्षाव आणि फर्स्ट रिस्पांडर्स' व संसाधनांची कमतरता याकडे संपूर्णत: दुर्लक्ष करतात.

संभाव्य आण्विकयुद्ध आणि परिणामांची भयावहता (भाग 1)

30 टक्‍के आवक जावक असलेल्या कॅलिफोर्नियातील पोर्ट ऑफ लांग बीच या मोठ्या अमेरिकन बंदरावर कन्टेनर शिपच्या माध्यमातून आणून वापरलेल्या एक मेगाटन वजनाच्या अण्वस्त्रांनी होणाऱ्या संसाधनिक, नागरिक व आर्थिक हानीचे भवितव्य जाणून घेण्यासाठी रॅंड कॉर्पोरेशनने केलेल्या आगाऊ सामरिक अंदाज सर्वेक्षणामध्ये असे आढळून आले की अशा ग्राऊंड ब्लास्ट न्युक्‍लियर वेपनच्या स्फोटानंतर काही लाख लोक मृत्युमुखी पडतील. तसेच या स्फोटाच्या 'न्युक्‍लियर फॉलआऊट'मुळे भयंकर आर्थिक परिणामाच्या जोडीला शेकडो चौरस किलोमटर्सचे क्षेत्र कुठल्याही प्रकारच्या निवासासाठी अयोग्य घोषित केले जाईल. बंदराजवळील सर्व तेलसाठे नष्ट झाल्यामुळे संपूर्ण वेस्ट कोस्टमध्ये तेलाचे प्रचंड दुर्भिक्ष जाणवू लागून नागरिकांच्या असंतोषाचा भडका उडेल. आण्विक स्फोटानंतरच्या वादळी आगीमुळे आणि आण्विक उत्सर्गामुळे सर्व संसाधनीय गोष्टींचा विध्वंस तर होईलच, पण जागतिक जहाज वाहतूक बंद झाल्यामुळे तरल अमेरिकन आणि जागतिक आर्थिक व्यवस्था पार कोलमडून जाईल.

इंटरनॅशनल फिजिशियन्स फॉर प्रिव्हेंशन ऑफ न्युक्‍लियर वॉरच्या अहवालानुसार, एक मेगाटन अणुबॉम्बचा स्फोट होताच एका सेकंदात स्फोटाच्या ठिकाणी 1200 फूट त्रिज्येचा 300 फूट खोल खड्डा पडतो आणि 2500 फूट त्रिज्येचा आगीचा लोळ निर्माण होतो. त्या आगीच्या लोळाच्या परतीचे तापमान आणि प्रकाश तेवढ्याच मोठ्या सूर्यक्षेत्रापेक्षा तीन पट जास्त असेल. ही आग तेथील जीवजीवाणू आणि संसाधनांना क्षणात भस्मसात करेल आणि पुढील 12 सेकंदांमध्ये किमान पाच ते सहा किलोमीटर्स दूरपर्यंत झेपावून तेथील माणसांचा व संसाधनांचा ठिक्‍कर कोळसा करेल. किमान 250 किलोमीटर्स वेगाने वाहाणाऱ्या गरम झोतांनी त्यांना भूईसपाट केले जाईल. त्यापुढच्या पाच किलोमीटर्समधील कमान 45 टक्‍के लोक तत्काळ मृत्युमुखी पडतील आणि उर्वरितांना झपाट्याने येणारा आगीचा लोळ आणि आण्विक ऊत्सर्गाचे शिकार व्हावे लागेल. या स्फोटामुळे निर्माण झालेल्या ब्लास्ट अथवा शॉक वेव्हजमुळे ग्राऊंड झिरोपासून किमान 25 किलोमीटर्स त्रिज्येच्या क्षेत्रात वाऱ्याच्या वेगाने उडणाऱ्या मलब्यामुळे असंख्य जीवहानी व अमाप वित्तहानी होईल. किमान दोन लाखांपेक्षा जास्त आगी लागल्यामुळे आगीची वादळे निर्माण होऊन तापमान 1500 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण पेयजल व्यवस्था व पाणीसाठा सुकून जाईल. खाद्यपदार्थ व खनीज तेल जळून जाईल आणि आरोग्य व्यवस्था, वीज पुरवठा ठप्प होईल. याच्याच जोडीला आण्विक उत्सर्गामुळे आगामी काही वर्षांसाठी ते क्षेत्र अणुबाधीत राहील.

भारतातील मुंबई व चेन्नई, पाकिस्तानमधील कराची व पोर्ट कासीम आणि उत्तर कोरियातील चांगजिन व वांगसांग यासारखी बंदरे आणि इतर असंख्य महानगरे देखील रॅंड कॉर्पोरेशनच्या पोर्ट ऑफ लांग बीचवरील अहवालाच्या कसोटीवर तंतोतंत खरी उतरतात. आजमितीला जगात किमान 31,000 अण्वस्त्रे असून त्यांपैकी अमेरिका, रशिया व चीनकडे सर्वात जास्त म्हणजे 14 हजार अण्वस्त्रे आहेत. ब्रिटन, फ्रांस, चीन, भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया, इराण व इस्त्रायलकडे उरलेली अण्वस्त्रे आहेत. अमेरिका व रशियाकडे प्रत्येकी किमान 4500 स्ट्रॅटॅजिक न्युक्‍लियर वॉर हेडस् ऑन हाय अलर्ट स्टेटस आहेत. अमेरिका आणि उत्तर कोरिया किंवा भारत आणि पाकिस्तानमध्ये आण्विक युद्ध झाल्यास त्यामध्ये केवळ एकच अणुबॉम्ब टाकला जाईल, अशी आशा वेडेपणाची आहे. लॉंग बीचवरील अणुबॉम्ब एक मेगाटन शक्तीचा होता. आजमितीला अण्वस्त्रधारी राष्ट्रांकडे यापेक्षा कितीतरी जास्त शक्तीचे अणुबॉम्ब तयार आहेत. ही अण्वस्त्रे केवळ काही मिनिटांमध्ये लॉंच होऊन त्याद्वारे शत्रूच्या सैनिकी, औद्योगिक, नागरिकी/सैनिकी/राजकीय/औद्योगिक नेतृत्त्व आणि आण्विक लक्ष्यांचा संपूर्ण विध्वंस करू शकतात. जगातील प्रत्येक माणूस, जीवित प्राणी, वनस्पती व संसाधनांना नष्ट करण्याची क्षमता या देशांमध्ये आहे.

उत्तर कोरिया आणि पाकिस्तान दोघेही चीनची सामरिक संपत्ती आहेत. दोघांपाशी लांब दुरीची क्षेपणास्त्रे आहेत. त्यामुळे अमेरिकेची थाड क्षेपणास्त्र प्रणाली, पॅट्रियॉट क्षेपणास्त्र, बी-1बी लॉंग रेंज बॉंबर्स आणि एफ 15/25 जेटस् किंवा भारताचे ब्रह्मोस/अग्नी क्षेपणास्त्र, एस 400 क्षेपणास्त्र विरोधी प्रणाली व मिराज/सुकॉय 30 विमानांमुळे त्यांची आण्विक समीकरणे बदलणार नाहीत. गेम थियरी आणि चिकन गेममध्ये उत्तर कोरिया व पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय विश्‍वासार्ह्यतेबरोबरच असे आण्विक अविचार सर्वंकष युद्धामध्ये परिवर्तीत होण्याचे सांभव्य देखील पणाला लागते. जर त्यांनी आपल्या अण्वस्त्रांनी अमेरिका आणि भारतावर पहिला वार केला तर त्या दोघांचा संपूर्ण विनाश अटळ आहे. पण जर दोघांनीही पहिले अण्वस्त्र न वापरता पारंपरिक युद्धाचा निर्णय घेतला तर अमेरिका व भारताची संरक्षणदले उत्तर कोरिया व पाकिस्तानला दणक्‍या मार देतील. अमेरिका, उत्तर कोरिया, भारत व पाकिस्तानमधील बेनबाव सामरिक व राजकीय तणाव आणि सैनिकी उन्मादाऐवजी मुत्द्देगिरीने सोडवायचा सल्ला रशियन राष्ट्रपती पुतीनने कोरियन क्षेपणास्त्र परिक्षण आणि पाकिस्तानी युद्धसंधी उल्लंघन संदर्भात दिला आहे. जर उत्तर कोरियन सर्वेसर्वा किम जोंग उन आणि पाकिस्तानी सेनाध्यक्ष कमर बाजवांना आपली सत्ता अबाधित राहावी असे वाटत असेल तर दोघेही युद्धाची कास न धरता आपली आण्विक अस्त्रे सुरक्षा प्रतिबंधासाठी वापरतील. नाही तर या आण्विक चिकन गेममध्येला कोंबडा कोण हे येणारा काळच सांगेल.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/sambhavy+aanvikayuddh+aani+parinamanchi+bhayavahata+bhag+2-newsid-79879637

No comments:

Post a Comment