Wednesday 15 February 2017

भारताने दाखवला ‘१०४ का दम’, इस्त्रोचा विश्वविक्रम

  • चेन्नई, दि. 15 - भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविण्याचा विक्रम केला आहे. PSLV- C37 या स्वदेशी बनावटीच्या प्रक्षेपकाच्या सहाय्याने हे उपग्रह अवकाशात सोडण्यात आले आहेत. चेन्नईपासून १२५ कि.मी. अंतरावरील श्रीहरिकोटा येथून बुधवारी सकाळी एकाच वेळी १०४ उपग्रह पाठवून भारत अशा प्रकारची कामगिरी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येणार आहे.

    रशियाच्या अंतराळ संस्थेने एका वेळी ३७ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. त्या तुलनेत भारताचे हे यश मोठे आहे. यापूर्वी भारताने जून २०१५ मध्ये २३ उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण केले होते. भारतीय शास्त्रज्ञांनी एक्सएल व्हॅरिएंट या रॉकेटचा वापर केला असून सर्वांत शक्तिशाली या रॉकेटचा वापर यापूर्वी भारताने महत्त्वाकांक्षी चांद्रयान व मंगळ मोहिमेसाठी केला होता.

    याशिवाय दुसऱ्या रॉकेटमध्ये दोन अन्य भारतीय सूक्ष्म उपग्रह असून, त्यांचे वजन १,३७८ किलो आहे. भारतीय नॅनो सॅटेलाईट आयएनएस-१ व आयएनएस-१बी यांना पीएसएलव्हीवर मोठ्या उपग्रहांना मदत करण्यासाठी विकसित करण्यात आलेले आहे. आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या नॅनो सॅटेलाईटचे प्रक्षेपण इस्रोची व्यावसायिक शाखा एन्ट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी केले जात आहे. कार्टोसॅट-२ साखळीतील मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.

    अशी कामगिरी करणारा भारत पहिला देश

    पीएसएलव्हीने २१४ किलो वजनाच्या कार्टोसॅट-२ साखळीतील उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे. त्याचा उपयोग पृथ्वीवर देखरेख ठेवण्यासाठी केला जाईल. त्यानंतर १०३ सहयोगी उपग्रहांना पृथ्वीपासून ५२० कि.मी. अंतरावरील कक्षेत समाविष्ट केले जाईल.

    त्यांचे एकूण वजन ६६४ आहे. यातील ९६ उपग्रह अमेरिकेचे आहेत, तर पाच उपग्रह हे इस्रोचे आंतरराष्ट्रीय ग्राहक इस्रायल, कजाकिस्तान, नेदरलँड, स्वित्झर्लंड, संयुक्त अरब अमिरातचे आहेत.

Lokmat Online : 15-February-2017 : 09:36:55

No comments:

Post a Comment