Sunday 23 October 2016

खंडणी नको - वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात संधी देणाऱ्या भारतीय चित्रपट निर्मात्यांना सैनिक कल्याण निधी देण्यासंदर्भात करण्यात आलेल्या बळजबरीबाबत भारतीय लष्कराकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. "लष्कराबरोबर राजकारण करु नका. भारतीय लष्करास अत्यंत शिस्तबद्ध, बिगर राजकीय व धर्मनिरपेक्ष पार्श्‍वभूमी लाभली आहे. तेव्हा अशा राजकीय चिखलफेकीमध्ये ओढले जावे, अशी लष्कराची इच्छा नाही,‘‘ असे संतप्त मत एका ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने व्यक्‍त केले आहे. ""सैनिक कल्याण निधीसाठी देण्यात येणारी रक्कम ही स्वेच्छेने देण्यात आली असल्यासच स्वीकारली जाते. खंडणी वा बळजबरी करुन देण्यास भाग पाडलेला निधी हा सैनिक कल्याण निधीसाठी स्वीकारला जात नाही,‘‘ अशी भावना अन्य एका अधिकाऱ्यानेही व्यक्त केली.

अनेक महिन्यांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर लष्कराने अंतिमत: स्वतंत्ररित्या निधी स्वीकारण्याचे मान्य केले असून यासाठीच सैनिक कल्याण निधीची (आर्मी वेलफेअर फंड बॅटल कॅज्युअल्टीज) स्थापना करण्यात आली आहे. मात्र राजकीय दबाव आणून निधी देण्यास भाग पाडले जाणे सर्वथा चुकीचे असल्याचे प्रातिनिधीक मत लष्करामधून व्यक्त करण्यात आले आहे. "सैनिक कल्याण निधीसाठी दिल्या जाणाऱ्या रकमेमागील भारतीय नागरिकांच्या भावनेबद्दल लष्कराच्या मनात जराही शंका नाही; मात्र ही रक्कम खंडणीचा भाग असू शकत नाही,‘ अशी तीव्र प्रतिक्रिया एअर व्हाईस मार्शल मनमोहन बहादूर (निवृत्त) यांनी व्यक्त केली आहे.  

No comments:

Post a Comment