Wednesday 12 October 2016

राजकारणापेक्षा मनोबल महत्त्वाचे - कर्नल सुरेश डी. पाटील

राहुल गांधींनी केलेल्या विधानांमागे बोलविता धनी कोण आहे? ‘सैनिकांच्या रक्ताची दलाली‘ हा शब्दप्रयोग त्यांना कोणी सूचविला असावा असा प्रश्‍न पडतो. सर्जिकल स्ट्राइकबद्दल सुरवातीला लष्कराचे कौतुक करणाऱ्या कॉंग्रेसच्या नेत्याने केवळ उत्तर प्रदेशात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर अशी टीका केली असावी का, असे वाटते. भारतीय सेनेच्या धाडसी मोहिमेचे कौतुक करण्याऐवजी सेनेचे मनोबल कमी होईल असे वक्तव्य करणे योग्य नाही. सर्व पक्षांनी सरकारच्या मागे उभे राहणे गरजेचे असताना पंतप्रधानांवर टीका करणे अत्यंत चुकीचे आहे.
सर्जिकल स्ट्राइकबद्दल गेल्या आठवड्याभरात भारतात उलटसुलट प्रतिक्रिया येताना दिसतात. 28 सप्टेंबरच्या सर्जिकल स्ट्राइकची कल्पना, नरेंद्र मोदींनी सर्व पक्ष प्रमुखाची बैठक दिल्लीत घेऊन विचार विनिमय करूनच घेतली. ह्या बैठकीत संरक्षण मंत्रालय, गुप्तचर विभाग उपस्थित होते. चर्चेअंती पारंपारिक युद्ध न करण्याचा निर्णय घेऊन सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय सर्वमताने मंजूर करण्यात आला. परंतु स्ट्राइकचा काळ, वेळ, दिशा ठरविण्याची जबाबदारी भारतीय सेनेवर सोपवली.

देशात पाकिस्तानविरुद्ध घराघरातून प्रक्षुब्ध प्रतिक्रिया येत असताना, प्रसारमाध्यमांनी हा विषय लावून धरला. ""पाकिस्तनला धडा शिकवा‘‘ असा सूर लावून पाकिस्तानच्या दुष्कर्माचा घडा आता भरत आला होता. आता खूप झाले-ह्यापुढे आम्ही सहन करून घेणार नाही व पाकिस्तानवर सैनिकी कारवाई होणे गरजेचे होते, अशा प्रतिक्रिया देशभर उमटल्या.

खरे तर मुंबईच्या 26/11 नंतर किंवा पठाणकोट हल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई होणे गरजेचे होते. परंतु देशाने त्या दोन्ही वेळेस संयम दाखवून शिष्टाचाराने, चौकशीसाठी आंतरराष्ट्रीय कौल आपल्या बाजूने घ्यावा ह्यासाठी प्रयत्न केला.

सरकारला साप तर मारायचा होता पण काठीदेखील मोडायची नव्हती. हा पवित्रा घेऊन पाकिस्तानला धडा शिकवायचा होरा होता. उरीचा ""फिदायीन‘‘ हल्ला हा काश्‍मीर बंदचा बदला घेण्यासाठी फुटीरवाद्यांनी पाकिस्तानच्या मदतीने केलेला "जहरी‘‘ प्रहार होता. सरकारने या काश्‍मीर बंदवर तोडगा काढण्यास सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट व चर्चा काढणेसाठी प्रयत्न केला. परंतु फुटीरतावाद्यांच्या आडमुठेपणामुळे हा प्रयत्न वायफळ गेला. उरीमध्ये दहशतवाद्यांच्या मदतीने खुले त्यांनी आम हल्ला घडवून आणला व ह्या हल्यात पाकिस्तानने सर्वतोपरी मदत केली. ह्या सर्व घटनांचा परिपाक म्हणजे पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पुन्हा पुष्टी मिळतच होती.

आज भारताची पत, प्रतिमा जागतिक महासत्तेच्या दिशेने उंचावत असताना हा विषय सरकारला संयमाने हाताळायचा होता. म्हणून "सर्जिकल स्ट्राइकचा पर्याय निवडला. पारंपारिक युद्ध करून पाकिस्तानवर आक्रमण करणे हा उद्देश नव्हता.

1971 च्या भारत पाक युद्ध सुरू होण्यापूर्वी माझी 14 ग्रेनेडिअर बटालियन उरी, पूँच, राजौरी मेहंदर भागात तैनात होती. आमच्या बटालियनला 4 डिसेंबर 1971 ला अंदाजे 10 ते 12 कि.मी. अंतरावर असलेल्या अटिया या गावाजवळ शत्रूचा पेट्रोल पंप व ""म्यूल डंप‘‘ नष्ट करण्याचा आदेश मिळाला. त्यासाठी आमच्या बटालिययाच्या डेल्टा कंपनीला हे काम सोपवण्यात आले. त्यांनी हे काम शिफातीने मेजर प्रकाश यांच्या नेतृत्वाखाली केले. परंतु, लेफ्टनंट बहुखंडी हा मोहरा त्यामध्ये धारातीर्थी पडला. फक्त सहा महिन्यांची सर्व्हिस करणारा मोहरा पडला. ही सीमेपारची ""रेड‘‘ एक प्रकारची सर्जिकल स्ट्राइक होती.
मी स्वतः 3 वर्षे 14 ग्रेनेडिअर बटिलियनमध्ये "young captan‘‘ म्हणून या सीमेवर रुजू होतो. सीमेवर अशा प्रकारच्या ""सर्जिकल स्ट्राइक‘‘ दर वारंवार होत असतात. व त्यांचे रिपोर्टिंग त्या काळात तरी होत नसे. प्रसारमाध्यमेही तेव्हा एवढ्या प्रमाणावर नव्हती.

पण आताची ""सर्जिकल स्ट्राइक‘‘ देशाला व जगाला सांगणे खरेच जरुरीचे होते. जर यशस्वी कारवाईबद्दल देशाला माहिती दिली नसती तर सैन्याचे मनोबल खचले असते. नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान नाहीत, तर ते संपूर्ण देशाचे आहेत. ह्या स्ट्राइकमध्ये 40 दहशतवादी पुन्हा भारतात घुसण्याच्या तयारीत असताना त्यांना उद्धस्त केले हे आंतरराष्ट्रीय समूहाला दाखवणे गरजेचे होते.

ह्या यशस्वी मोहिमेनंतर सैन्यदलाचे कौतुक करणे गरजेचे आहे. अशा मोहिमेत सैनिक प्राण तळहातावर घेऊन मृत्युच्या जबड्यात जातात. ह्या स्ट्राइकमध्ये जे अधिकारी जवान गेले होते त्यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. ते नशीबवान आहेत. त्यांना दिलेले काम फत्ते करून आपला जीव वाचवून परत मायभूमीत आले. हे खरे तर आमच्या देशाचे सौभाग्य आहे. मी स्वतःदेखील सीमेपार जाऊन अशा एका स्ट्राइकमध्ये जाऊन परत आलेलो आहे.
सर्जिकल स्ट्राइकबद्दल बोलण्यापेक्षा आपले जे 20 मोहरे पडले त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबांचे सांत्वन करून मदत करणे गरजेचे आहे. माझा स्वःतचा सातारा जिल्ह्यातील वडगाव (ता. कराड) येथील आत्येभाऊ हवालदार जगताप असाच जम्मू-काश्‍मीरमध्ये शत्रूशी लढताना शहीद झाला. देशाने त्याला मरणोत्तर "वीरचक्र‘ देऊ केले. परंतू त्याची बायको व दोन मुले कायमची पोरकी झाली.

काही महिन्यापूर्वी कर्नल महाडिकांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यावेळेस आम्ही त्यांच्या गावी घरी गेलो होतो. त्यावेळेस त्यांची पत्नी गाईसारखा हंबरडा फोडून रडत होती. दोन्ही लहान मुले त्या मातेला बिलगून रडत होती.

आपण इतिहासात डोकावून पाहिल्यास असे दिसून येईल की शिवाजी महाराजांनी आपल्या आया, बहिणीची कपाळं पांढरी होवू नये म्हणून बरेच तह केले. त्यांना खून खराबा नको होता. त्यांनी पुरंदरचा तह व नंतर आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीला गेले कारण तह करून प्रश्‍न सोडवायचा होता. मोदींनी शिवरायांची निती वापरून देशाची प्रतिभा व पत जगभरात उंचावली यात शंका नाही.

No comments:

Post a Comment