Friday 30 September 2016

भारताकडून 25 देशांना कारवाईची माहिती

नवी दिल्ली - भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात आज केलेल्या लष्करी कारवाईची माहिती सरकारने अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्ससह महत्त्वाच्या 25 देशांच्या राजदूतांना दिली. कोणत्या परिस्थितीत ही कारवाई करण्यात आली, याबाबत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी "साउथ ब्लॉक‘मध्ये राजदूतांना ही माहिती दिली.

या वेळी जयशंकर म्हणाले, ‘लष्कराची आजची कारवाई म्हणजे दहशतवाद विरोधी कारवाईचे उत्तम उदाहरण आहे. जम्मू - काश्‍मीरसह, भारतीय शहरांवर हल्ला करण्यासाठी प्रशिक्षित करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर ही कारवाई करण्यात आली. आणखी कारवाई करण्याची भारताची कोणतीही योजना नाही. मात्र लष्कर दहशतवाद्यांना आणखी हल्ले करू देणार नाही.‘‘

विशेष म्हणजे आज सकाळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी चर्चा केली. "लष्करे तैयबा‘ आणि "जैश ए महंमद‘ या संघटनेच्या दहशतवाद्यांवर पाकिस्तानने कारवाई करावी, असे अमेरिकेचे मत असल्याचे राईस यांनी या वेळी सांगितले

- - पीटीआय

No comments:

Post a Comment