Saturday 9 July 2016

भारताचा आदर्श घ्या - पीटीआय

सागरी वादांबाबत अमेरिकेचा चीनला सल्ला
वॉशिंग्टन - आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करत शेजारी देशांबरोबर असलेले सागरी वाद कसे हाताळावे, हे चीनने भारताकडून शिकणे आवश्‍यक आहे, असा टोमणा अमेरिकेने चीनला मारला आहे. दक्षिण चिनी समुद्रातील वादग्रस्त बेटांच्या संदर्भातील चीनच्या भूमिकेबाबत अमेरिकेने ही टिपण्णी केली आहे.

वादग्रस्त बेटांवर चीनने आपला हक्क सांगितला असून, फिलिपीन्ससह इतर सहा देशांनी चीनच्या या अरेरावीला आव्हान दिले आहे. याबाबतचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुरू असून, त्याचा निकाल बारा जुलैला अपेक्षित आहे. चीनने मात्र याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला निकाल देण्याचा अधिकार नसल्याची भूमिका घेतली असून, दिलेला निकाल मान्यही करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताचे उदाहरण देताना अमेरिकेच्या ईशान्य आशिया विभागाचे संरक्षण सचिव अब्राहम डेन्मार्क म्हणाले,""भारत आणि बांगलादेशदरम्यान सुरू असलेल्या सागरी वादाचा आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2014 मध्ये निकाल लागून तो भारताविरोधात गेला. भारताने शांतपणे हा निर्णय मान्य केल्याने आज त्या दोन्ही देशांचे संबंध विश्‍वासाचे आहेत. याचा त्या दोन्ही देशांना फायदा होत आहे. हा भारताचा आदर्श चीनने घेणे गरजेचे आहे.‘‘ अमेरिकेचे मोठे पाठबळ असून आणि स्वत: एक शक्तीशाली देश असूनही भारताने ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले, त्याबाबत त्यांचे कौतुकच करायला हवे, असेही डेन्मार्क यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment